वृत्तसंस्था/ बेंगळूर
चीनमधून आयात होणाऱया खेळण्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याने याचा फायदा भारतीय खेळण्यांना उठविता आला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये भारतीय खेळण्यांना विक्रीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची बाब समोर आली आहे.
भारत सरकारने मागच्या वर्षी देशांतर्गत खेळणी निर्मितीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारामध्ये या खेळण्यांना ग्राहकांनी अपेक्षीत असा प्रतिसाद नोंदविला आहे.
बंदीचा फायदा
1 जानेवारी 2021 रोजी भारत सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डस (बीआयएस) प्रमाणित नसलेल्या खेळण्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती. याचा फायदा भारतीय उद्योजकांना या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने उठविता आला.
आयात 30 टक्के घटली
2021-22 आर्थिक वर्षामध्ये भारतात होणारी खेळण्यांची आयात 30 टक्के घटली आहे. सदरच्या वर्षामध्ये 392 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या खेळण्यांची आयात करण्यात आली आहे. याच्या मागच्या आर्थिक वर्षात 562 दशलक्ष डॉलर्सच्या खेळण्यांची आयात करण्यात आली होती. आयातीत खेळण्यांवर सरकारने कस्टम शुल्क 20 टक्क्यांवरून 60 टक्के केल्याने आयातीमध्ये लक्षणीय घट दिसली आहे.
भारताची उलाढाल
भारत हा खेळण्यांच्या बाजारात 13 टक्के विकासासह वेगाने कार्यरत आहे. भारताची खेळणी उद्योगाची उलाढाल ही 1.5 अब्ज डॉलर्सची झाली आहे. तर 2020-21 मध्ये चीनी उत्पादनांचा वाटा 71 टक्के इतका आयातीत होता जो एप्रिल 2022 मध्ये घटून 61 टक्क्यावर आला आहे.