चार विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण : मराठी माध्यमाचा निकाल 83.44 टक्के
प्रतिनिधी/ बेंगळूर
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 83.89 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. चार विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्यामध्ये सौंदत्ती येथील इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी अनुपमा हिरेहोळी हिचाही समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात घसरण झाली आहे. मागील वर्षी 85.13 टक्के निकाल लागला होता.
बेंगळूरमध्ये सोमवारी सकाळी कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र आणि शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मुख्य सचिव रितेशसिंग यांनी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. 2022-23 या शैक्षणिक वर्षातील दहावी परीक्षा 31 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. सुमारे 8.35 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर मूल्यमापनासाठी 62 हजारहून अधिक शिक्षकांना नियुक्त करण्यात आले होते. 24 एप्रिल ते 3 मे या कालावधीत मूल्यमापन कार्य झाले होते.
शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत निकालामध्ये ग्रामीण विद्यार्थी वरचढ ठरले आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87 टक्के तर शहरी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 79.62 टक्के इतके आहे. परीक्षेला एकूण 8,35,102 विद्यार्थी हजर झाले होते. त्यापैकी 8,00,619 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यावेळीही अधिक राहिले आहे. 87.87 टक्के मुली तर 80.08 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 83.44 टक्के इतके आहे.
चित्रदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम, यादगिरी शेवटच्या स्थानी
चित्रदुर्ग जिल्ह्याने निकालात अग्रस्थान पटकावले आहे. या जिल्ह्याचा निकाल 96.8 टक्के इतका लागला आहे. त्यापाठोपाठ 96.74 टक्के निकालासह मंड्या जिल्हा द्वितीय स्थानी तर 96.68 टक्के निकालासह हासन जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. यादगिरी जिल्ह्याने निकृष्ट कामगिरी केली असून शेवटच्या स्थानावर म्हणजेच 35 व्या स्थानावर राहिला आहे. या जिल्ह्यातील 75.49 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष श्रेणीत म्हणजेच 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,47,634 इतकी आहे. या विद्यार्थ्यांना ए प्लस श्रेणी मिळाली आहे.
राज्यातील 1,517 सरकारी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 482 अनुदानित आणि 1,824 विनाअनुदानित शाळांचाही निकाल शंभर टक्के लागला आहे. मात्र, 34 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. यामध्ये 11 अनुदानित आणि 23 विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे.
पुरवणी परीक्षेसाठी 15 मे पर्यंत अर्ज
उत्तरपत्रिकेची नक्कलप्रत मिळविण्यासाठी 14 मेपर्यंत अर्ज दाखल करता येईल. फेरगुणमोजणी व उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी 21 मे पर्यंत अर्ज करता येईल. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत 15 मे आहे.