आजारी विद्यार्थ्यांना घरीच राहण्याचा सल्ला
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट दिसत आहे. बेंगळूर येथे दोन शाळांमध्ये 31 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच शाळांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. आजारी विद्यार्थ्यांना घरीच राहण्याचा सल्ला शिक्षकांकडून दिला जात आहे. त्यामुळे आता प्रत्येक शाळेला खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मध्यंतरी कमी झालेला कोरोना आता पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. कोरोना संक्रमित व्यक्तींची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. राज्यातील शाळा 16 मेपासून सुरू झाल्या असून जूनच्या दुसऱया आठवडय़ात बेंगळूरमधील उत्तर बेंगळूर व दासरहळ्ळी येथील दोन शाळांमध्ये 31 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर स्थानिक शिक्षण विभाग व आरोग्य विभागाने परिसरातील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या चाचण्या केल्या आहेत.
शाळांमध्ये सामाजिक अंतर राखणे तसे कठीण असल्यामुळे आजारी विद्यार्थ्यांना घरीच राहण्याचा सल्ला शिक्षकांकडून दिला जात आहे. प्रत्येक शाळेला सूचना करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच शाळेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे.
कोरोनाची लक्षणे आढळल्यास पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात असल्याने शिक्षण तसेच आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.