उदयनिधी यांची भूमिका : कायदेशीर मार्गाने मुद्द्याला सामोरा जाणार
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या स्वत:च्या टिप्पणीचा बचाव केला आहे. माझ्या टिप्पणीत काहीच चुकीचे नव्हते आणि मी कायदेशीर मार्गाने या मुद्द्याला सामोरा जाणार आहे. मी केवळ स्वत:च्या विचारसरणीबद्दल बोललो होतो असा दावा उदयनिधी यांनी केला आहे.
सनातन धर्माच्या विरोधात भविष्यातही मी बोलत राहणार आहे. तामिळनाडूत मागील 100 वर्षांपासून सनातन धर्माच्या विरोधात आवाज उठत आहे. आम्ही पुढील 200 वर्षांपर्यंत देखील याच्या विरोधात बोलत राहू असा दावा उदयनिधी यांनी केला आहे.
पूर्वी कधीच म्हटले गेले नव्हते असे मी काहीच बोललो नव्हतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार ईव्ही रामासामी यांनी देखील अशाचप्रकारचे वक्तव्य केले होते असा दावा उदयनिधी यांनी केला आहे. सनातन धर्म डेंग्यू आणि मलेरियाप्रमाणे एक आजार असून तो समूळ नष्ट केला जावा असे उदयनिधी यांनी 2 सप्टेंबर रोजी म्हटले होते.
नीटविरोधातील द्रमुकच्या स्वाक्षरी मोहिमेच्या अंतर्गत विदुथलाई चिरुथिगल काची पक्षाचे प्रमुख थोल तिरुमावलन यांची उदयनिधींनी भेट घेतली आहे. येथेच बोलताना त्यांनी सनातन धर्म विषयक वक्तव्यावरुन मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणींविषयीच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत.
उदयनिधी स्टॅलिन आणि मंत्री पी.के. शेखरबाबू यांच्याविरोधात कुठलीच कारवाई न करणे हा पोलिसांचा मोठा बेजबाबदारपणा असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले होते. तर संबंधित वक्तव्यावरून उदयनिधी यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सनातन धर्मावर टिप्पणी करून उदयनिधी यांनी घटनेचे उल्लंघन केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.