वार्ताहर /काकती
सिद्धेश्वरनगर येथील गटार तुंबल्याने सिद्धेश्वर मंदिरसमोरील सर्व्हिस रस्ता, देसाई गल्ली उड्डाणपूल रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिक हैराण झाले आहेत. मनपाने तातडीने गटारींची साफसफाई करून सांडपाण्याचा निचरा करावा. अन्यथा, उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
काकती येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या दक्षिणेकडील श्री सिद्धेश्वरनगर ही नवी वसाहत मनपाच्या कार्यक्षेत्रात असून ती मनपाच्या वॉर्ड क्रमांक 56 मध्ये येते.
या संपूर्ण वसाहतीतील सांडपाणी सिद्धेश्वर मंदिरसमोरील सर्व्हिस रस्त्याच्या गटारीत येते. सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला पूर्वीपासून नाला होता. राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम केल्यापासून सिमेंट काँक्रीटच्या पाईपमध्ये गाळ, माती, प्लास्टिक कचरा रुतून बसल्याने सांडपाणी निचरा होणे थांबले आहे. यामुळे गटार तुंबून सांडपाणी सिद्धेश्वर मंदिरसमोरील सर्व्हिस रस्ता, देसाई गल्ली प्रमुख प्रवेशद्वार, उड्डाणपूल रस्त्यावर येत आहे.
या रस्त्यावरून जाणाऱया नागरिक, महिला, शाळेची मुले-मुली यांना मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. टू-व्हीलर, फोर व्हीलर धावताना हे सांडपाणी अंगावर उडत आहे. यामुळे सार्वजनिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. दिवसागणिक येथील घाणीमध्ये वाढ होत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या संदर्भात काकती ग्रा.पं. अध्यक्ष सुनील सुणगार म्हणाले, सिद्धेश्वर नगरमधील सांडपाण्याने ही गटार तुंबली आहे. राष्ट्रीय महामार्ग रस्त्यातून घातलेल्या पाईप ब्लॉक झाल्याने पाणी रस्त्यात थांबत आहे. ही बाब मनपाच्या संबंधित अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिली आहे. परंतू अद्यापही कोणतीच हालचाल नाही, असे तरुण भारतशी बोलताना त्यांनी सांगितले.
या रस्त्यात थांबून असलेल्या सांडपाण्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येत्या आठवडाभरात ब्लॉकेजीस काढून सांडपाण्याचा निचरा करावा, अन्यथा उग्र आंदोलन छोडण्याच्या तयारीत नागरिक आहेत.