पुणे / प्रतिनिधी :
तुळजापूर येथे नवरात्रीत खंडेनवमीला तुळजाभवानी मातेच्या मंदिरात अजबळी देण्याची प्रथा आहे. ही अनिष्ट, अमानुष प्रथा असून कायदेविरोधी तसेच मानवी सभ्यतेविरुद्ध आहे. त्यामुळे ही प्रथा थांबवावी, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. या मागणीचे पत्र डॉ. गंगवाल यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार व न्यायाधीश याना ईमेलद्वारे आणि पोस्टाद्वारे पाठवले आहे.
डॉ. गंगवाल म्हणाले, नवरात्रात खंडेनवमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेसमोर असुराला नैवद्य म्हणून बोकड कापले जाते, या प्रथेला अजबली म्हणतात. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रथेला कोणतेही धार्मिक अधिष्ठान नाही. भाविक स्वतःची भावनिक, कौटुंबिक, मानसिक गरजा भागविण्यासाठी केलेल्या नवसापायी हजारो बोकड देवीपुढे नैवेद्य म्हणून कापतात आणि तो मांसाहार प्रसाद म्हणून सेवन करतात. या कालावधीत अनेक बोकड तर कापले जातात, परंतु अनारोग्य, रोगराई यालाही आमंत्रण मिळते. शिवाय सद्य:स्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेथे होणारी गर्दी टाळणेही गरजेचे आहे. ही प्रथा सुसंस्कृत विज्ञानवादी मानवधर्माच्या विरोधात आहे. अशी प्रथा कायमस्वरूपी हद्दपार करण्यात यावी.
अधिक वाचा : ‘अग्निपथ’ भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या दोघांना अटक
हरियाणा हायकोर्ट आणि त्रिपुरा हायकोर्टाने अलीकडेच देवी देवतांसमोर पशु पक्षी बळी देण्यावर बंदी घातली आहे. गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये बऱयाच वर्षांपासून कायद्यानेच बळी प्रथेवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातही ही प्रथा बंद व्हावी, यासाठी प्रशासनाने कृती समिती तयार करावी. कायदा व प्रबोधनाद्वारे अजबली प्रथा रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करावी. यातून अंधश्रद्धा निर्मूलन आणि कायदा आणि पर्यावरण यांचे रक्षण होईल, असेही त्यांनी नमूद केले.