मणतुर्गा येथील पालकांची मागणी : आहारात बऱ्याचवेळा आढळून येतो कचरा,अळ्या
खानापूर : तालुक्यातील काही शाळांत एनजीओमार्फत मध्यान्ह आहार पुरविण्यात येत आहे. याचा दर्जा सुमार असल्याने विद्यार्थी जेवत नाहीत. यासाठी शाळेतच मध्यान्ह आहार बनविण्यात यावा, अशी मागणी शिक्षणप्रेमी आणि पालकांतून होत आहे. येत्या आठ दिवसात मध्यान्ह आहाराबाबत योग्य निर्णय न झाल्यास मध्यान्ह आहार ग्रामस्थांकडून बनवून विद्यार्थ्यांना देण्यात येईल, असे मणतुर्गा ग्रा. पं. क्षेत्रातील मऱ्याप्पा पाटील, ईश्वर बोबाटे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. एनजीओमार्फत पुरविण्यात येणाऱ्या मध्यान्ह आहाराबाबत अनेकवेळा तक्रार करून देखील मध्यान्ह आहाराबाबत योग्य निर्णय घेण्यात आला नाही. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच तालुक्यातील 133 शाळांना मध्यान्ह आहार एनजीओमार्फत पुरविण्यात येत आहे.
आहार थंड आणि बेचव
हा आहार पहाटेपासूनच शाळांना पुरवला जातो आणि याचे वितरण विद्यार्थ्यांना दुपारी दीड वाजता करण्यात येते. त्यामुळे हा आहार थंड आणि बेचव असतो. तसेच आहाराच्या दर्जाबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत.
शाळेतच मध्यान्ह आहार तयार करण्यास परवानगी द्यावी
या आहारात अळ्या, कचराही बऱ्याच वेळेला आढळून आला आहे. आहारात सकसता नसल्याने विद्यार्थी हा आहार ताटामध्ये घेतात आणि जेवण न करताच ते टाकून देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी एनजीओकडून पुरवण्यात येणारा मध्यान्ह आहार तातडीने बंद करण्यात यावा आणि शाळेतच मध्यान्ह आहार तयार करण्यासाठी अनुमती देण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. मध्यान्ह आहार शाळेत करण्याची अनुमती न दिल्यास मणतुर्गा पंचायत क्षेत्रातील सर्व शाळांमधून मध्यान्ह आहार ग्रामस्थांमार्फत तयार करून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
एसडीएमसीच्या माध्यमातून नियोजन असेल तर सप्टेंबरनंतर मंजुरी देऊ!
याबाबत मध्यान्ह आहाराचे तालुका अधिकारी महेश परीट यांना विचारले असता ते म्हणाले, मध्यान्ह आहार एसडीएमसीच्या माध्यमातून तयार करण्यासाठी नियोजन असेल तर सप्टेंबरनंतर त्यांना मंजुरी दिली जाईल. यासाठी स्वयंपाक खोली असणे आवश्यक आहे. यासाठी ग्राम पंचायतीतून स्वयंपाक खोलीचे नियोजन केल्यास मध्यान्ह आहारास अनुमती देण्यात येणार आहे. यासाठी एसडीएमसीने गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मध्यान्ह आहाराच्या नियोजनाबाबत म्हणणे सादर करावे, असे ते म्हणाले.