‘इंडिया’ची मागणी : संसद अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारचा निषेध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यासह केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी सोमवारी संसद भवन संकुल परिसरात निदर्शने केली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या खासदारांसह ‘इंडिया’ आघाडीतील विविध पक्षांचे खासदार उपस्थित होते.
विरोधकांना शांत करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर थांबवा, ‘विरोधकांचा आदर करा, धमकावणे बंद करा!’ अशा फलकांसह घोषणाबाजीही करण्यात आली. आम आदमी पक्षाच्या काही खासदारांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कारागृहाच्या मागे उभे असलेले पोस्टर्सही दाखवले.
या आंदोलनात सहभागी झालेल्या खासदारांमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार शशी थरूर, के. सी. वेणुगोपाल, मनीष तिवारी, के सुरेश, वर्षा गायकवाड, बेनी बेहनन, अँटोनी, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह, खासदार राघव चढ्ढा, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष, शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि सीपीआय(एम) जॉन ब्रिटास यांचा समावेश होता.