शिरोली ग्रामपंचायत सदस्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील हेम्माडगा परिसरातील गावांना रात्री 6 नंतर ये-जा करणे अवघड झाले आहे. कारण वनविभागाने हेम्माडगा रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे या परिसरातील गावांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाहुणेमंडळी तसेच गावकरी रात्री उशिरा आल्यास त्यांची अडवणूक केली जात आहे. तेव्हा वनविभागाला या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी शिरोली ग्रा. पं. सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सायंकाळी 6 नंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद केली जाते. कोणीही आले तर त्याची चौकशी करून माघारी पाठविण्यात येत आहे. शेतकरी देखील शेतातील साहित्य रात्रीच्यावेळी नेताना किंवा गावामध्ये सायंकाळी 6 नंतर पाहुणे येत असतील तर त्यांची देखील अडवणूक केली जात आहे. हेम्माडगा, जामगाव, देगाव, मेंडिल, पाली, कोंगाळा, गवाळी, पास्टोळी, कृष्णापूर, आमगाव या गावांना याचा मोठा त्रास होत आहे. भीमगड परिसरात ही सर्व गावे आहेत. त्या ठिकाणी विविध निर्बंध घातले जात आहेत. त्यामुळे जनतेला मोठा त्रास होत आहे. तेथील
फॉरेस्ट गार्ड अडवणूक करीत आहेत. कोणीही तक्रार केली तर जिल्हा वन अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगितले जात आहे. तेव्हा योग्य अधिसूचना काढून येथील जनतेला सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर अनेक पूल आहेत. त्या पुलांची बांधणी योग्यप्रकारे करण्यात आली नाही. शिरोली ग्रा. पं.च्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे जेसीबीच्या सहाय्याने केली जात आहेत. त्यामुळे कामगारांना काम दिले जात नाही, असा आरोपही निवेदनात केला आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य विजय मादार, दीपक गवाळकर, महादेव शिवलकर यांच्यासह म. ए. समितीचे निरंजन सरदेसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.