कागल : बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या जेवणावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना इशारा दिला आहे. तुमची मग्रुरी थांबवा! बांधकाम कामगारांना जेवण देता म्हणजे उपकार करत नाही.ही वृत्ती बंद करा. जेवण देता म्हणजे तुमचं शासनाचे कर्तव्य आहे. असा इशारा घाटगे यांनी दिला आहे.
बांधकाम कामगारांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे आहे. या तक्रारीचा पाढा लाभार्थी कामगारांकडून वाचला जात आहे. मुश्रीफसाहेब, तुम्ही तुमच्या खिश्यातील पैशातून किंवा तुमच्या घरातून हे जेवण देत नाही. तर महाराष्ट्र शासनाच्या पैशातून हे जेवण मिळते. या जेवणाबाबत सुधारणा करण्यात यावी, अन्यथा यामध्ये गांभीर्याने आम्हाला लक्ष घालावे लागेल. असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.
कामगारांनी चांगले जेवण मागणे हा काय गुन्हा आहे का? उलट महिलेला तुमचे जेवण बंद करू का? असे उत्तर देणे म्हणजे ही मग्रूरता आहे. हे तातडीने थांबवा. कामगारांना १२० रुपये खर्च करून चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नसेल तर हे १२० रुपये कुठे खर्च होतात. याचे पण संशोधन मुश्रीफ यांनी केले पाहिजे. मी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, ते प्रश्न तुम्ही भावनिक आवाहन करून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नका असा टोलाही घाटगे यांनी मंत्री मुश्रीफांना लगावला आहे.