आमटेमधील जंगल भागात मुलींची वसती शाळा, घनदाट जंगलात इमारत उभारल्याने सरकारच्या निर्णयाबद्दल आश्चर्य
प्रतिनिधी /खानापूर
कर्नाटक शासनाच्या समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून चालणाऱ्या कर्नाटक वसती शिक्षण संस्था-संघ यांच्या माध्यमातून राज्यात विविध वसती शाळा चालविण्यात येतात. यातीलच एक तालुक्यात संगोळी रायण्णा वसती शाळा, राणी चन्नम्मा वसती शाळा यासह अन्य वसती शाळा सुरू आहेत. जांबोटी येथे मंजूर झालेली कित्तूर चन्नम्मा वसती शाळेचे बांधकाम आमटे येथे करण्यात आले आहे. या वसती शाळेचे काम पूर्ण झाले असून भव्य इमारती निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र ही शाळा पूर्ण मुलींसाठी असल्याने इतक्या घनदाट जंगलात ही वास्तू निर्माण केल्याने कर्नाटक सरकारच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कर्नाटक वसती शिक्षण सेवा संघाच्या माध्यमातून राणी चन्नम्मा वसती शाळा निर्माण करण्यात आली आहे. आमटे येथील महसूल खात्याच्या सर्व्हे नंबर 100 मधील 5 एकर जागेत ही भव्य इमारत उभारण्यात आली आहे. महसूल खात्याने ही जागा समाज कल्याण खात्याला वर्ग केली आहे. आमटे हा परिसर घनदाट जंगलाने व्यापला असून हा भाग अती संरक्षित जंगल क्षेत्र म्हणून तसेच व्याघ्र कॅरीडोर म्हणून घोषित केले आहे. तसेच कस्तुरी रंगराजन अहवालानुसार पश्चिम घाट संरक्षित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला आहे. असे असताना या परिसरात कोणतेही बांधकाम अथवा उद्योगधंदे यासह सरकारने काही नियमावली घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच या ठिकाणचा वापर केला पाहिजे. घनदाट जंगल परिसर असताना या, परिसरात वाहतुकीची अद्याप पूर्ण सोय नसताना समाज कल्याण खात्याने कोणत्या हट्टापायी या ठिकाणी इतका मोठा शैक्षणिक प्रकल्प उभारला? या ठिकाणी सहावी ते दहावी मुलींच्या वसती शाळेची ही इमारत आहे. या ठिकाणी फक्त मुली शिक्षण घेणार आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस होतो. येथील हवामान पूर्णपणे चार महिने पावसाळी असते. या ठिकाणी वन्यप्राण्यांचा मुक्त वावर तसेच विविध जातीचे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. फक्त मुली या ठिकाणी शिक्षण घेणार असल्याने हे ठिकाण धोकादायक असल्याचे मत अनेक अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केले. शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलांना भेटण्यासाठी येणाऱ्या पालकांनाही हे ठिकाण अत्यंत गैरसोयीचे आहे. अशा अनेक बाबी असताना कर्नाटक सरकार सीमाप्रश्नाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हा प्रकल्प उभारला गेला आहे. मात्र विद्यार्थिनींच्या आरोग्याचा आणि भविष्याचा विचार होणे गरजेचे होते.
विद्यार्थिनींची काळजी घेतली जाईल : जिल्हा कार्यदर्शी
याबाबत समाज कल्याण खात्याच्या जिल्हा कार्यदर्शी उमा सालीगौडर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, या ठिकाणी वसती शाळा असल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच ड दर्जाचे कर्मचारीही या ठिकाणी राहणार आहेत. शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या क्वॉर्टर्स बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे लोकही येथेच राहणार आहेत. तसेच विद्यार्थिनींच्या आरोग्यासह त्यांची सर्व काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यामुळे जंगल भागात वसती शाळा झाली म्हणून घाबरण्याचे कारण नाही, असे त्या म्हणाल्या. या प्रकल्पाचे अभियंते चंद्रशेखर यांनी कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केली.