संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे उद्गार
वृत्तसंस्था /गांधीनगर
गुजरातच्या गांधीनगरमध्ये डिफेन्स एक्सपो 2022 चा शुभारंभ झाला आहे. यादरम्यान बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आफ्रिकन देशांमधील शांतता आणि स्थैर्याकरता समर्थन देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे उद्गार काढले आहेत. गांधीनगरमध्ये भारत-आफ्रिका संरक्षण चर्चेदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी 43 आफ्रिकन देशांच्या प्रतिनिधींना संबोधित केले आहे.
परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये आफ्रिकन देशांसोबत मिळून काम करण्याची भारताची तयारी आहे. आफ्रिका खंडासोबत भारताची संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी आफ्रिकन लोकांबद्दल आमची सद्भावना दर्शविणारी आहे. भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध हे मानवी समानता तसेच प्रतिष्ठेच्या मूळ तत्वावर आधारित असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
भारत आणि आफ्रिकेतील देश एक सुरक्षित सागरी वातावरण निश्चित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मागील काही वर्षांमध्ये भारताने आफ्रिकेतील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेत मोठे योगदान दिले आहे. या क्षेत्रात संयुक्त राष्ट्रसंघाच्या बहुतांश शांतता मोहिमेत भारत सहभागी झाला आहे. भारताने स्वतःच्या सैन्य प्रशिक्षण संस्थांमध्ये अनेक आफ्रिकन देशांच्या अधिकाऱयांना प्रशिक्षित केल्याचे विधान राजनाथ सिंह यांनी केले.