गव्हर्नर शक्तिकांत दास : आरबीआयचा आर्थिक स्थिरता अहवाल सादर
वृत्तसंस्था /मुंबई
आरबीआयने आपल्या आर्थिक स्थिरता अहवालात म्हटले आहे की भारतीय बँकिंग प्रणाली मजबूत आहे आणि बँकांचे एनपीए दशकाच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. भांडवल आणि तरलता स्थिती देखील मजबूत असल्याचे यावेळी सांगितले आहे. त्याचवेळी आरबीआयने असेही म्हटले आहे की वाढती जागतिक अनिश्चितता आणि कठीण परिस्थिती असूनही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर व मजबूत राहिली आहे. बँकांचा सकल एनपीए मार्च 2023 अखेर 10 वर्षांच्या नीचांकी 3.9टक्के आणि निव्वळ एनपीए 1 टक्क्यांवर आला आहे. मार्च 2018 मध्ये तो 11.5 टक्के आणि 6.1 टक्के होता जो सर्वोच्च पातळी असल्याचे स्पष्ट केले होते.
जागतिक अनिश्चितता – कठीण परिस्थिती अर्थव्यवस्था सावरली : दास
जागतिक अनिश्चितता आणि कठीण परिस्थिती असूनही, भारतीय अर्थव्यवस्था चांगली सावरली आहे आणि भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली आहे. तसेच ती आगामी काळातही राहणार असल्याचा दावा यावेळी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केला आहे. बँका आणि कॉर्पोरेट्सच्या ताळेबंद अहवालात म्हटले आहे की मजबूत देशांतर्गत मागणी, पायाभूत सुविधांमध्ये मजबूत सार्वजनिक गुंतवणूक, व्यवसाय आणि घरगुती गरजांसाठी सुलभ निधी आणि व्यवसायाप्रती सकारात्मकता यामुळे देशांतर्गत वाढीचा वेग गती घेताना दिसून येतो.
नॉन परफॉर्मिंग अॅसेट किंवा एनपीए म्हणजे काय?
जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था बँकेकडून कर्ज घेते आणि त्याची परतफेड करत नाही, तेव्हा त्याला बुडीत कर्ज किंवा एनपीए म्हणतात. म्हणजेच कर्ज वसुलीची फारशी आशा नाही. त्यामुळे बँकेचे पैसे बुडतात आणि बँक तोट्यात जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, बँकेच्या कर्जाचा हप्ता 90 दिवस किंवा तीन महिन्यांपर्यंत भरला नाही, तर ते कर्ज एनपीए घोषित केले जाते. इतर वित्तीय संस्थांच्या बाबतीत ही मर्यादा 120 दिवसांची आहे.