वार्ताहर /उचगाव
1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळादिन म्हणून पाळला जातो. उचगाव परिसरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. सर्व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काही कन्नडधार्जिण्या युवकांनी गतवर्षीचे लाल-पिवळे झेंडे काढून नवीन झेंडे बदलण्याची कामगिरी मात्र फत्ते केली.
पोलिसांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. गेल्या दोन-चार दिवसांमध्ये काही कन्नड युवकांनी कन्नड अभिनेते राजकुमारच्या प्रतिमा लावण्यावरून थोडा वादंग झाल्याने या चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मात्र, बंदोबस्तात वाढ करून पोलीस फौजफाटा मोठय़ा प्रमाणात या चौकामध्ये ठेवला होता.
काळय़ादिनी या परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र प्राथमिक व माध्यमिक कन्नड, मराठी, उर्दू या सर्व शाळांमध्ये शिक्षण खात्याच्या आदेशानुसार राज्योत्सव दिन साजरा करण्यासाठी भाग पाडले. तसेच शासकीय कार्यालयांतूनही राज्योत्सव दिन साजरा करण्यात आला.
उचगाव, तुरमुरी, सुळगा आदी गावांतील दुकानदारांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन कडकडीत हरताळ पाळून निषेध नोंदविला. यामुळे सर्व पश्चिम भागात शुकशुकाट पसरला होता. तसेच बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील हिंडलगा, सुळगा, उचगाव फाटा, तुरमुरी आणि बाची येथील कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवर पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आला होता.