वृत्तसंस्था/ बेंगळूर
यशस्वी जैस्वाल आणि अरमान जाफर यांच्या दमदार शतकांमुळे येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात मुंबईने उत्तर प्रदेशविरूद्ध खेळताना दुसऱया डावात 4 बाद 449 धावा जमवित एकूण 662 धावांची भक्कम अघाडी घेतली आहे. जैस्वालने 181 तर जाफरने 127 धावा जमविताना दुसऱया गडय़ासाठी या जोडीने 286 धावांची भागिदारी केली.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 393 धावा जमविल्यानंतर उत्तर प्रदेशचा पहिला डाव 180 धावांत समाप्त झाल्याने मुंबईने 213 धावांची आघाडी मिळविली. मुंबईने 1 बाद 133 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी दिवस अखेर 140 षटकांत 4 बाद 449 धावा जमविल्या. मुंबईच्या दुसऱया डावात सलामीचा फलंदाज आणि कर्णधार पृथ्वी शॉ 64 धावांवर बाद झाल्यानंतर जैस्वाल आणि जाफर यांनी आपल्या संघाला भक्कम स्थितीत नेताना दुसऱया गडय़ासाठी 286 धावांची भागिदारी केली. जैस्वालने या सामन्यात दोन्ही डावात शतके झळकविली. पहिल्या डावात त्याने 100 धावा जमविल्या तर दुसऱया डावात त्याने 372 चेंडूत 1 षटकार आणि 23 चौकारांसह 181 तर जाफरने 259 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारांसह 127 धावा झळकविल्या. सुवेद पारकरने 22 धावा जमविल्या. सर्फराज खान 23 तर मुलानी 10 धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई प. डाव सर्वबाद 393, उत्तर प्रदेश प. डाव सर्वबाद 180, मुंबई दु. डाव- 140 षटकांत 4 बाद 449 (जैस्वाल 181, अरमान जाफर 127, पृथ्वी शॉ 64, प्रिन्स यादव 2-69, मावी आणि सौरभ कुमार प्रत्येकी एक बळी).