आमदार शशिकांत शिंदे यांनी केली भाजपावर घणाघाती टिका
प्रतिनिधी/ सातारा
जय भवानी जय शिवाजी, मराठी माणसाचा अपमान करणाऱया राज्यपालांचा निषेध असो. चले जाव चले जाव.. राज्यपाल चलेजाव, जो महाराष्ट्र से टकराऐगा मिठ्ठीमे मिल जायेगा, दादागिरी नही चलेगी…खाली मुंडी वर पाय. अशा घोषणांनी राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यालयाबाहेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संगीता साळुंखे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश सचिव स्मिता देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष पूजा काळे, शशिकांत वाईकर, भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष मोहनराव जाधव, पुनम नलावडे वनिता नलावडे गिरीश फडतरे प्रशांत कुरळे, वैभव मोरे सचिन जाधव, गणेश ताटे, विनायक बर्गे, संभाजी ताटे, स्वप्निल वाघमारे, संतोष पवार, समाधान कदम, विशाल शिर्के, मंगेश गायकवाड, सचिन जाधव, सागर पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यपाल हे मोठं उच्च पद आहे. या पदाला प्रतिष्ठा आहे. परंतु काही वर्षापासून आम्ही बघतो आहोत. राज्यपाल एखाद्या पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत. आजच नव्हे तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वक्तव्य करुन अपमान केला. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल आक्षेपाहार्य वक्तव्य केले. आणि आता महाराष्ट्रातील मराठी बांधवाचा अपमान केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. माणूस एकदा चुकतो दोनदा चुकतो सातत्याने अशा प्रकारचे जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा आणि मराठी बांधवांचा अपमान करणे म्हणजे ठरवून आहे का हे सारे हा आमचा प्रश्न आहे. मग आपण त्याप्रमाणे आम्ही विरोधात भूमिका घेतल्यानंतर ते स्पष्टीकरण करत होते. स्पष्टीकरण करताना सुद्धा माफी मागण्याचा लवलेश त्यांच्यामध्ये दिसत नाही. आपण दाखवता की आपण बोललो की वेगळा अर्थ काढला जातोय. राज्यपाल हे कोणत्या पक्षाचे नसतात. सर्व जनतेचे असतात. ते जे निर्णय घेत आहेत ते पक्षीय हेतूने असतात. महाराष्ट्रात अनेक जाती धर्माची लोक येतात. पैसा कमावतात. त्याच महाराष्ट्राच्या भूमीत अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. राज्यपालांचा हेतू राजकीय होता, असे त्यांनी सांगितले.
पुढे संजय राऊत यांच्या अटकेबाबत शिंदे म्हणाले, ईडीला त्यांचा अधिकार असतो. त्याचा निकाल काय लागेल हे कोर्ट ठरवले जाते. सुप्रिम कोर्टात 247 केसेस एकत्र करुन ईडीच्या कार्यक्षेत्राबद्दल होत असलेल्या कारवायाबाबतच्या असलेल्या अधिकाराबद्दल मागणी केली होती. सुप्रिम कोर्टाने पूर्वीप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशी केल्यानंतर काय साध्य झाले याचे खुलासे करणे फार गरजेचे असते. आरोप सुद्धा त्यांनीच सिद्ध करायचे. त्याकरता कोर्टात पिरिअड किती असावा. दोन दोन वर्ष जातात. त्यामध्ये एखाद्याचे राजकीय करिअर उद्धवस्त होते. गुह्याची चार्जसिट लवकर दिली दाखल केली जात नाही, असे कोर्टाने सांगितले. अनिल देशमुख, नवाब मलिक यांची जी चौकशी झाली. ईडीची कारवाई राजकीय होवू नये. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करु नये. संजय राऊत हे विरोधात बोलत होते. म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे, अशी सगळीकडे चर्चा आहे.