पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील बहुतांश भागात तुरळक पावसासह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तविण्यात आल्याने बळीराजाच्या मनात धडकी भरली आहे. 8 मार्चपर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
वातावरणातील बदलामुळे देशाच्या बहुतांश भागात तुरळक पाऊस होत आहे. या बदलामुळे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गडगडाटी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात नंदुरबार, नाशिक, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बीडमध्ये पुढील तीन ते चार दिवस यलो अलर्ट, तसेच पुणे जिल्हय़ात 6 व 7 मार्च रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात गडगडाटीसह पाऊस होणार असून, यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कमाल तापमान घटणार
दरम्यान, राज्यात शनिवारी बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. पुढील दोन दिवस कमाल तापमान कायम राहणार असून, पावसाचा प्रभावामुळे त्यानंतर मात्र कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
वादळी वारा नुकसान करणार
या कालावधीत मोठय़ा प्रमाणात वादळी वारा वाहणार आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने पिकांना नुकसान होण्याचा धोका हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.