आठवी-दहावीच्या शेतकऱयांच्या मुलींना वार्षिक दोन हजार रुपये शिष्यवृत्ती देणार
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांच्या मुलांना उच्चशिक्षण आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुख्यमंत्री शेतकरी विद्यानिधी योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेला जिल्हय़ात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट शिष्यवृत्ती जमा केली जाते. या योजनेंतर्गत आता माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनादेखील शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
जिल्हय़ात ही योजना प्रभावीपणे राबविली गेली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्यादेखील अधिक आहे. यापुढे आठवी ते दहावी वर्गात शिकणाऱया शेतकऱयांच्या मुलींना दरवषी 2 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याबरोबर या योजनेंतर्गत पीयुसी, आयटीआय, डिप्लोमा, बी फार्मासी, नर्सिंग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील ही शिष्यवृत्ती दिली जाते. आता माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनादेखील विद्यानिधी दिला जाणार आहे.
संबंधित माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी आधारकार्ड, शाळेतील विद्यार्थी नोंदणी संख्या, शिवाय शेतीचा सातबारा आदी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घ्यावा. मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. बेटी बचाव, बेटी पढाओ कार्यक्रमाबरोबर आता विद्यार्थिनींना विद्यानिधी देखील उपलब्ध होणार आहे.
विद्यानिधी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा…
मुख्यमंत्री शेतकरी विद्यानिधी योजनेंतर्गत पीयुसी, पदवी, आयटीआय, डिप्लोमा आदी शेतकऱयांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. यापुढे आठवी, नववी आणि दहावीत शिकणाऱया विद्यार्थिनींनादेखील विद्यानिधी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा.
-शिवनगौडा पाटील, उपनिर्देशक कृषी खाते