अनेक गैरसोयींमुळे मुलांचे भवितव्य टांगणीला : बिबटय़ाच्या दहशतीमुळे शाळांना सुटी दिल्याने संभ्रम
अरुण टुमरी/काकती
बिबटय़ाच्या दहशतीने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील बऱयाच शाळांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण खात्याच्या धोरणानुसार शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन वर्ग चालू आहेत. परंतु, अनेक गैरसोयींमुळे मुलांचे भवितव्य टांगणीला पडले आहे. शिक्षक, पालकवर्ग चिंतेत असून मुलांना घरी कुणी विचारणारे नसल्याने मुलांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागातील सर्वसाधारण समाज शेतकरी, शेतमजूर, कामगारवर्ग असल्याने मुलांचे आई-वडील दिवसभर शेतावर व कामावर जात असतात. या साऱया वर्गाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपल्या मुलांच्यासोबत घरी राहणे अवघड आहे. ग्रामीण भागातील मुलांची आई अभ्यास घेऊ शकत नाही. आपल्या मुलांवर देखरेख, दक्षता ठेवू शकत नसल्याने काही मुले भरकटत चालली आहेत. ज्या मुलांच्या घरी स्मार्ट फोन आहे, त्यांच्याकडे जाऊन इतर मुले अभ्यास करीत आहेत. तर काही गरिबांच्या घरात स्मार्ट फोन असूनही रिचार्ज भरण्यासाठी वेळेवर पैसे नसल्याने ती मुले लाभ घेऊ शकत नाहीत, अशीही परिस्थिती आहे.
मुलांचा दिनक्रम फिस्कटला
शाळा बंद असल्याने मुलांच्या दैनंदिन दिनक्रमात शिस्त राहिली नाही. त्यांची शिक्षणाविषयी ओढ कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी आई-वडिलांना कामावरून घरी येईपर्यंत आपल्या मुलांची काळजी लागत आहे. पालक घरी आले की ही मुले बाबा आमची शाळा कधीपासून सुरू होणार, असा प्रश्न रोजच विचारत आहेत. पण त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर पालकांजवळ नाही. त्यामुळे आपली मुले बिघडणार तर नाहीत ना? अशी भीती पालकवर्गासमोर उभी राहिली आहे.
मोबाईल वापरामुळे मुलांमध्ये आजार वाढले
प्राथमिक, माध्यमिक शाळेत शिकणाऱया मुलांना ऑनलाईन वर्गाद्वारे शिक्षण मिळत आहे. या ऑनलाईन शिक्षणाव्यतिरिक्त मुले इंटरनेटमध्ये अडकण्याची शक्मयता वाढली आहे. मौजेसाठी गेम खेळणे या छंदात देखील मग्न आहेत. परिणामी मुलांचा मोबाईलचा वापर वाढला आहे. यामुळे अनेकांना डोकेदुखी, नेत्रविकार असे विकार होत असल्याचे दिसून येत आहे.