श्रीनिवास यांचे प्रतिपादन : व्हीटीयूमध्ये व्याख्यानाचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व विद्यापीठाचा स्थापना दिवस यानिमित्त डॉ. बी. आर. आंबेडकर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष श्रीनिवास यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. करिसिद्धप्पा होते.
यावेळी श्रीनिवास म्हणाले, आंबेडकर हे सोशल इंजिनिअर होते. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन सिंचन प्रकल्पाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आंबेडकर यांनी सर्वच धर्मामधील अनिष्ठ रुढी, परंपरा व प्रथा दूर करण्याचा अविरत प्रयत्न केला. समाजाच्या काही प्रथांचा त्यांना त्रास झाला. पण त्यांनी कधीही समाजाला तोडले नाही. हे विशेष होय.
अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रयत्न
अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर समाजाच्या सर्व क्षेत्रात काम करून एकात्मता वाढीस लागण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजामध्ये रुजवून समाज एकत्र राहण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे सांगितले.
डॉ. करिसिद्धप्पा यांनी, व्हीटीयूच्या रौप्यमहोत्सवानिमित्त विशेष व्याख्यानमालिका आयोजित करण्यात आली असून या मालिकेतील हे दुसरे व्याख्यान आहे, असे सांगितले. प्रा. प्रल्हाद राठोड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी परीक्षेत उत्तम गुण मिळविलेल्या अनुसचित जाती-जमाती व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कुलसचिव प्रा. आनंद देशपांडे यांनी स्वागत केले. कुलसचिव प्रा. रंगा स्वामी यांनी आभार मानले.