अपुऱ्या सुविधांविरोधात विद्यार्थी रस्त्यावर
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभापूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यापीठाकडून योग्य सुविधा दिल्या जात नसून अभ्यासक्रम पूर्ण नसताना परीक्षा घेतल्या जात असल्याची तक्रार करत विद्यार्थ्यांनी सुवर्णविधानसौधच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांसोबतच आरसीयूच्या व्यवस्थापनाचाही गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये स्वच्छता नाही. त्याचबरोबर निकृष्टप्रतीचे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना दिले जातात. अभ्यासक्रम पूर्ण नसताना परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा पुढे ढकला अशी विनंती करूनदेखील त्याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. वेळोवेळी तक्रार करूनदेखील विद्यार्थ्यांना योग्य न्याय दिला जात नसल्याची तक्रार आंदोलक विद्यार्थ्यांनी केली. सोमवारी आरसीयूचा 11 वा वार्षिक पदवीदान समारंभ सुवर्णविधानसौधच्या सभागृहात आयोजिला होता. यादरम्यान 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केल्याने गोंधळ उडाला. विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्यामुळे पोलिसांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.