कोगनोळी येथे अशोक कौलवकर महाराज यांचे विचार
वार्ताहर / कोगनोळी
मानवी जीवनात मन आणि बुद्धीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मन हे चंचल आहे. वैराग्य म्हणजे त्याग. मन स्थिर ठेवण्यासाठी अभ्यास व वैराग्य पाहिजे, असे विचार गारगोटी (ता. भुदरगड) येथील अशोक कौलवकर महाराज यांनी व्यक्त केले. कोगनोळी येथील पूर्णानंद नगरातील वैष्णव मंदिरामध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचन सेवेत ते बोलत होते.
कौलवकर महाराज पुढे म्हणाले, संसारातील सगळय़ा गोष्टी येणाऱया व जाणाऱया आहेत. हिरा कोंदणात ठेवावा, देव मंदिरात ठेवावा, मन परमात्म्यात ठेवावे. कारण परमात्म्याच्या पलीकडे जात नाही आणि त्याच्यातून परत येत नाही. परमात्मा स्थिर आहे, परमात्मा व्यापक आहे. सूक्ष्म बुद्धीसाठी चांगले कर्म केले पाहिजे. दुःखद घटनेत संत तुकाराम महाराजांनी सकारात्मक विचार केला असल्याचेही अशोक कौलवकर महाराज यांनी सांगितले.
यावेळी पांडुरंग काजवे महाराज, सूरदास गायकवाड महाराज, पूर्णानंद काजवे महाराज, एकनाथ साळोखे, संगाप्पा गोते, मारुती वाघवेकर, हिंदूराव नागराळे, भीमराव जगदाळे, शाहीर संभाजी माने, सदाशिव कोळी, हरीबा साळुंखे आदी उपस्थित होते.