शिराळा (सांगली)- शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वर्ग करा, तसेच उसाची दुसरी उचल २०० रुपये द्यावी, पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आज शिराळा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी शेट्टी म्हणाले,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोहत्सान अनुदान देण्याची घोषणा करून अडीच वर्षे झाली. या आधीच्या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर १ जुलै पासून पैसे वर्ग करणार म्हणून घोषीत होते. परंतु सत्तांतरानंतर हा निर्णय थांबवण्यात आला.१३ जुलैच्या कोल्हापूरच्या मोर्च्या नंतर मुख्यमंत्री यांनी पुढच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेवून तातडीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू असे सांगितले होते. १३ जुलै नंतर तीन कॅबिनेट बैठका झाल्या. पण अजून ही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे ९ ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची पूर्व तयारी म्हणून ३१ जुलैला कराड राज्य कार्यकारणीची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
यावेळी महेश खराडे, पोपट मोरे, संपर्क प्रमुख ॲड सुधीर संदे, रवी दुकाने, लता गायकवाड, राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिराळा तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पन्नास हजार रुपयांचा निधी राजु शेट्टी यांनी सुपुर्द केला.
-प्रीतम निकम