पंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा घेतला होता निर्णय,शासकीय यंत्रणेकडून समजूत
प्रतिनिधी /काणकोण
सतत चौथ्यांदा अनुसूचित जमातींसाठी वॉर्ड राखीव ठेवल्याने त्याचप्रमाणे 16 किलोमीटर दूर असलेले मतदान केंद्र इतरत्र न हलविल्याने येणाऱया पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा जो निर्णय पैंगीण पंचायतीमधील चिपळे, काळशी, तिर्वण आणि बादेगाळ भागांतील मतदारांनी घेतला होता त्या मतदारांचे मनपरिवर्तन करण्यात काणकोणच्या शासकीय यंत्रणेला यश आले आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तसेच राज्य निवडणूक आयुक्त यांच्या सूचनेनुसार काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर आणि सर्कल निरीक्षक रोहिदास गावकर यांनी नुकतीच चिपळे वाडय़ाला भेट देऊन मतदारांशी चर्चा केली आणि त्यांची समजूत काढली.
प्रभागाची राखीवता हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मात्र सध्या या मतदारांना मार्ली येथील प्राथमिक शाळेत जाऊन जे मतदान करावे लागते त्यावर येणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी तोडगा काढणे शक्य आहे. तूर्त यात कसलाच बदल करणे अशक्य आहे, असे यावेळी सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारांना गाळये येथील मतदान केंद्रावर मतदान करायला संधी दिली जाते. मात्र पंचायत निवडणुकीच्या वेळी 16 किलोमीटर दूर असलेल्या मार्ली केंद्रावर जावे लागते. या ठिकाणी वाहतुकीची कसलीच साधने नाहीत, अशी येथील मतदारांची कैफियत आहे.
त्याचप्रमाणे काळशी, चिपळे, तिर्वण या भागांत 377 इतके मतदार आहेत, तर मार्ली, तिर्वाळ भागांत केवळ 219 इतके मतदार आहेत. दरवेळी अनुसूचित जमातींसाठी प्रभाग राखीव ठेवला जावा याकरिता ज्यांनी पुढाकार घेतला आणि सर्वसाधारण गटावर तसेच इतर मागासवर्गियांवर अन्याय केला त्यांच्यावरील राग यावेळी मतदान करूनच व्यक्त करण्याचा निर्णय शेवटी या मतदारांनी घेतला आहे.