ही कहाणी झारखंडमधील रुदल देवी नामक कलाकाराची आहे. ही कलाकार एका हाताने उत्कृष्ट पेंटींग बनविते. अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या रुदल देवी यांनी ही कला कुठलेही प्रशिक्षण न घेता स्वबळावर विकसित केली आहे. घरच्या गरीबीमुळे त्यांचे बालवयातच लग्न लावून देण्यात आले होते. नवऱयाच्या घरीही गरीबीच होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना कोणता ना कोणता मार्ग शोधून काढावा लागणार होता. केवळ गरीबीचेच संकट होते असे नव्हे तर एक हात अधू असल्यामुळे शारीरिक क्षमतेवरही परिणाम होत होता. अशा परिस्थितीत त्यांनी ही कला विकसित केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
आता त्या प्रतिवर्ष तीन ते चार लाखांचे उत्पन्न या कलेतून मिळवित आहेत. त्यांच्या भागात या कलेला ‘सोहराय’ किंवा ‘कोहबर’ कला असे म्हणतात. ही एक पारंपरिक चित्रपद्धती असून तिचे प्रशिक्षण घ्यावे लागते. मात्र, रुदल देवी यांनी प्रशिक्षणाशिवाय केवळ निरीक्षणाने या कलेचे संवर्धन केले आहे. प्रथम छोटी छोटी चित्रे काढून त्यांनी आपला कार्यक्षम हात या कलेमध्ये तयार केला. आता महिन्याकाठी अशी अनेक चित्रे करून त्यांच्या विक्रीतून त्यांनी आपली गरीबी दूर केली आहे. त्यांचे आईवडील ही कला जाणतात. त्यांच्याकडूनच त्यांना काही प्राथमिक धडे मिळाले होते. या कलेच्या माध्यमातून भिंतीवर चित्रे चितारली जातात. कोणाच्याही घरात लग्न समारंभ किंवा कोणतेही शुभकार्य असल्यास अशा कलाकारांना बोलाविले जाते आणि भिंती सारवून त्यावर या पद्धतीने चित्रे रंगविली जातात. आता रुदल देवी अन्य महिलांनाही ही कला शिकवित असून वीस महिलांना त्यांनी तयार केले आहे. त्यामुळे या महिलांच्याही रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. विविध देवांची चित्रे, विविध पशुंची चित्रे, निसर्गसौंदर्य इत्यादींवर ही कला आधारित आहे. झारखंडमधील मान्यवर कलाकारांनी रुदल देवी यांच्या निर्धाराचे आणि कलाप्रेमाचे कौतुक केले असून त्यांना काही पुरस्कारही मिळाले आहेत. निर्धाराच्या बळावर अपंगत्वावर मात करता येते, हे त्यांचे तत्व आहे.