येळ्ळूरच्या अभियंत्याने वाटली 120 किलो मिठाई
सांबरा : देशभक्ती व्यक्त करताना काही जण देशाच्या प्रेमाबद्दल भाषणे देतात, स्वातंत्र्याबद्दल माहिती देतात. काही जण मिठाई वाटतात. अशाच प्रकारे येळ्ळूर येथील अभियंते हणमंत कुगजी यांच्या कुटुंबीयांनी विविध शाळा, हायस्कूल आणि झोपडपट्टीमध्ये जाऊन 15 ऑगस्ट रोजी 120 किलो मिठाई वाटप करून आपले देशप्रेम दाखवून दिले. येळ्ळूर येथील हे अभियंते नेहमीच गोर-गरिबांना मदतीचा हात पुढे करत असतात. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदत केली. परराज्यांतून आलेल्या उंट हाकणाऱयांना तब्बल 15 हजार रुपयांची मदत केली. यासह इतर सामाजिक कार्यामध्ये ते नेहमीच भाग घेत असतात. हणमंत कुगजी यांच्यापेक्षाही त्यांची पत्नी उज्वला या नेहमीच समाजाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतात. एखाद्या वेळी हणमंत कुगजी मागे राहतील. मात्र, आपण त्यांना मदत केली पाहिजे, याची आठवण उज्वला आठवण करून देतात. त्यामुळे हणमंत कुगजी हे तत्परतेने बाहेर पडतात आणि मदत करत असतात. आशादीप सोशल वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य सुरूच असते.
15 ऑगस्ट रोजी या कुटुंबाने झोपडपट्टीमध्ये जाऊन मिठाईचे वाटप केले. याचबरोबर येळ्ळूरमधील महाराष्ट्र हायस्कूल, चांगळेश्वरी हायस्कूल, समिती शाळा, मराठी मॉडेल स्कूल, उर्दु प्रायमरी स्कूल, ज्ञानसागर इंग्रजी स्कूल, मराठी व कन्नड वाडी शाळा, शिवाजी विद्यालय या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिठाई दिली. यावेळी त्यांच्याबरोबर परशुराम खेमणाकर, साक्षी जाधव, आनंद शिंदोळकर, सुयश कुगजी आदी उपस्थित होते.