Maharashtra Politics : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय जाहीर केला यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जय बळीराजा म्हणावं, असे आदेश दिले आहेत. मुनगंटीवारांच्या ‘वंदे मातरम’च्या घोषणेनंतर आता काँग्रेसनं जय बळीराजाची घोषणा दिली आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांनंतर आता नाना पटोले चर्चेत आले आहेत.
कार्यकर्त्यांनी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, वंदे मातरम् आमचा स्वाभिमान आहे, पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. वंदे मातरमला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळीराजा म्हणणं यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही जय बळीराजा म्हणणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

