पुणे : सरत्या हंगामात पाऊस चांगला झाल्याने ऊस क्षेत्र वाढले आणि हीच परिस्थिती आगामी काळात राहणार आहे. त्यामुळे यंदा एक ऑक्टोबर रोजी कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर सहकार संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
ऊस गाळप हंगाम 2021-22 बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, पांडुरंग शेळके उपस्थित होते. पाटील म्हणाले, राज्यात यंदाचा साखर हंगामाचे मोठे आव्हान होते. राज्यात साखर कारखानदारी वाढावी म्हणून अनेक प्रयत्न झाले आहेत. परिणामी ऊस क्षेत्र आणि कारखाने वाढले आहेत. मराठवाडय़ात ऊस क्षेत्र मोठय़ा प्रमाणात वाढले असून, ऊस हंगाम यंदा बरेच दिवस चालला. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. विशेषत: ऊसतोडणीच्या प्रश्नाने बिकट स्थिती निर्माण झाली. आता शेतकरी, कारखाने यांच्यासमोर निर्माण झालेल्या ऊस तोडणीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ॲप तयार करण्यात आले आहे. पुढील काळात त्याचा वापर करून नियोजपूर्वक गाळप करण्यात येईल.
साखर कारखानदारांच्या माध्यमातून हार्वेस्टरचा वापर वाढविण्यात येत असून, कारखाने यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकारने यांत्रिकीकरण खरेदीस अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर आगामी हंगाम लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे. 25 हजार मेट्रिक टनाने ऊस क्षेत्र वाढलेले आहे. ऊस क्षेत्राशी निगडित लोकांकडून सहकार्य मिळाल्याने विविध अडचणींवर मात करणे शक्य झाले. सरासरी हंगाम यंदा 173 दिवस, तर अधिकाधिक 240 दिवस चालला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. इथेनॉल उपक्रम हाती घेतल्याने त्याचेही उत्पादन यावेळी वाढविण्यात आले असल्याकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीवर बरीच चर्चा सुरू आहे. तथापि, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी निवडणुका होऊ दे. त्या निवडणुका पार पडल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेता येतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.