कसबा बीड/ प्रतिनिधी
कोगे तालुका करवीर येथे अज्ञाताकडून उसाच्या फडास आग लागून ऊस जळून खाक झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सावरीची पटी या भागामध्ये दुपारच्या प्रहरात अज्ञाताकडून उसाच्या फडास आग लावण्यात आली. त्यामुळे जवळपास दहा ते अकरा एकर मधील ऊस जळून खाक झाला आहे. या ऊस जळालेल्या क्षेत्रांत प्रामुख्याने महादेव घंगरगोळे, सरदार घंगरगोळे, दगडू घंगरगोळे, शिवाजी खाडे-पाटील, भीमराव खाडे-पाटील, जोतिराम खाडे-पाटील, सागर पाटील , पांडुरंग पाटील, भगवान पाटील, शामराव हरुगले, कृष्णात हरुगले, सरदार हरुगले, युवराज हरुगले, सागर हरुगले, अनिल हरुगले, सचिन हरुगले, दीपक चव्हाण, विलास चव्हाण, पवित्रा चव्हाण ,संजय चव्हाण, तसेच मोहिते मळा आदी शेतकऱ्यांचे शेतामध्ये पिकवलेले ऊस पिक आगीमध्ये भस्म झाले आहे. सदर घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली आहे. या आगीस कोण कारणीभूत आहेत ? की शॉर्टसर्किटने आग लागली ? याचा तपास सुरू आहे.
आडसाली लागण केलेले हे उस पिक आगीत सापडल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचा घास काढून घेतला आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही . ऊसतोड सुरू झाली की ऊस घालवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याची घाई होत असते. ऊस गेला की जमलेला पालापाचोळा याची विल्हेवाट लावणे व पुढील पीक घेणे यामध्ये शेतकरी सतत कार्यरत असतो. हे करत असताना निसर्गाने घालून दिलेले नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे ऊन वारा व वेळ याचा विचार करून पालापाचोळा पेटवणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रतिवर्षी घटना घडत असतात व इथून पुढे होणार याचा विचार करण्याची सर्व शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. अन्यथा केलेले कष्ट वेळ व पैसा या होणाऱ्या नुकसान शेतकरी वर्गच राहील हे कटू सत्य आहे.