वार्ताहर/कराड
जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी संघटना प्रतिनिधी व कारखाना प्रतिनीधींच्या बैठकीत उसाच्या पहिल्या उचलीची कोंडी फोडण्यात यश आले आहे. या बैठकीत रेठरेच्या यशवंतराव माहिते कृष्णा कारखान्याने सर्वाधिक 3 हजार रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. तर जयवंत शुगरने 2951 रूपये देण्याचे जाहीर केले आहे. दोन टप्प्यात एफआरपी देणाऱया कारखान्यांचा निषेध करण्यात आल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
चालू गळीत हंगामातील ऊसदर व पहिली उचल जाहीर करावी म्हणून शेतकरी संघटनांच्या वतीने महिन्यापासून आंदोलने करण्यात येत आहेत. रयत क्रांती, बळीराजा व संघटनांनी एकत्र येत ऊसदर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून 3500 रूपये पहिली उचल जाहीर करावी म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली होती. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवस तोड व वाहतूक बंद आंदोलन केले होते.
शेतकरी संघटनांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, पंजाबराव पाटील, बळीराजाचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, तालुका अध्यक्ष पोपट जाधव व विविध कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर वेळेत बैठक होत नसल्याने व बैठकीला कारखान्यांचे चेअरमन उपस्थित नसल्याने रयत क्रांती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी सभात्याग केला.
पंजाबराव पाटील म्हणाले की, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन 3000 रुपये तर जयवंत शुगरने 2951 रुपये दर जाहीर करून जिह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे. त्यामुळे येणाऱया काळात ऊस दरासाठी जिह्यातील साखर कारखानदारांमध्ये स्पर्धा होऊ शकते. या बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी कारखान्यावरील वजन काटय़ासंदर्भात वैधमापन अधिकाऱयांना सूचना दिलेल्या आहेत. यापुढे गोपनीय पद्धतीने जिह्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे तपासण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. तसेच ऊस उत्पादक शेतकऱयांनी खासगी वजन काटय़ावर केलेले वजन कारखान्याने स्वीकारले पाहिजे, असे आदेश दिले असल्याचे पंजाबराव पाटील म्हणाले.
कारखान्यांनी जाहीर केलेली पहिली उचल कृष्णा कारखाना 3000 रुपये, जयवंत शुगर 2951, रयत अथणी 2925, दत्त इंडिया 2700, जवाहर 2721, माण खटाव 2700, ग्रीन पावर 2801, सह्याद्रि 2375, बाळासाहेब देसाई 2318, अजिंक्यतारा 2290, किसनवीर 2350, शरयू 2500, स्वराज 2212 रूपये