बिबटय़ाला पकडण्यासाठी वनविभागाच्या केलेल्या कृत्याचा शेतकऱयांत संताप : संपूर्ण ऊसपीक कापून नेल्याने नाराजी
वार्ताहर /सांबरा
बेळगावमध्ये गेल्या बऱयाच दिवसापासून वन विभागाला व पोलिसांना चकवा देत असलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी शिमोगा येथून दोन हत्तींना आणण्यात आले आहे. या हत्तींच्या चाऱयासाठी वनविभागाने मुतगा येथील एका शेतकऱयाला पूर्वकल्पना न देताच त्याचे उभे ऊस पीकच घेऊन गेले आहेत. वन विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे त्या शेतकऱयाला फटका बसला असून सध्या या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
शेतकऱयाला किंवा नागरिकाला एखादे झाड तोडायचे असेल तर वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी अनेकवेळा हेलपाटे मारावे लागतात. मात्र येथे वनविभागाने चक्क त्या हत्तींच्या चाऱयासाठी म्हणून एका शेतकऱयाचे उभे ऊस पीकच घेऊन जाण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे वनविभागाच्या या कृत्याबद्दल शेतकऱयांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुतगा-मुचंडी संपर्क रस्त्यानजीक असलेल्या राजू कणबरकर यांच्या शेतातील ऊस पीक वन विभागाने तोडुन नेले आहे. अंदाजे तीन गुंठे शेतातील ऊसपीक मुळासकट तोडून घेऊन गेले आहेत. शेतकरी राजू कणबरकर नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी शेताकडे गेले असता ऊस तोडणीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर ऊस तोडण्याचा प्रकार करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर राजू कणबरकर यांनी जाऊन संबंधित वन अधिकाऱयाला याबाबत विचारले असता त्यांनी आपली चूक मान्य करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
पूर्वकल्पना न देता नेले पीक
आमच्या शेतातील उसाचे उभे पीक मला कोणतीही पूर्वकल्पना न देता वन विभागाने नेले आहे. त्यामुळे मला नुकसान सोसावे लागले आहे. वनविभागाने जर मला सांगितले असते तर मी उदारमनाने ऊस पीक दिलेही असते. मात्र मला न सांगता ऊसपीक घेऊन गेले आहेत.
– राजू कणबरकर