प्रेमभंगामुळे बसव कॉलनीतील घटनेने एकच खळबळ : घरच्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाचे स्वप्न अधुरे
प्रतिनिधी / बेळगाव
प्रेम करून बघावे, असे म्हटले जाते. मात्र प्रेम केल्यानंतर त्याचा अंत कसा होऊ शकतो हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा माणूस कोणत्याही थराला जातो, हे अनेकवेळा दिसून आले आहे. असाच धक्कादायक प्रकार बसव कॉलनी येथे शुक्रवारी सकाळी घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेमाला पेयसीने विरोध केला म्हणून प्रियकराने तिचा खून केला. त्यानंतर त्यानेही आत्महत्या करून आपले जीवन संपविले. या प्रेमीयुगुलाचा अंत अशाप्रकारे झाल्यामुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे.
रामचंद्र बसाप्पा तेणगी (वय 25, मूळचा रा. सौंदत्ती) याचे रेणुका केंचाप्पा पाचीन्नावर (वय 25, रा. मदलूर, ता. सौंदत्ती) हिच्यावर प्रेम होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. रामचंद्र हा एमए अभ्यासक्रमाला होता. भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन तेथेच वसतिगृहामध्ये राहत होता. शिक्षण घेत असताना त्याने एएसआयची परीक्षादेखील दिली. सध्या तो पीएसआयची परीक्षा देण्याच्या तयारीला लागला होता.
रेणुका हिने डीजीएनएम नर्सिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर ती केएलई येथे नर्स म्हणून सेवादेखील बजावत होती. दोघेही एकाच समाजाचे होते. त्यामुळे त्यांनी प्रेम केले. मात्र रेणुकाच्या घरातून लग्नाला विरोध झाला. त्यामुळे रेणुकाने आता आम्ही दोघे विभक्त होऊ, कारण घरातून विरोध होत आहे, असे रामचंद्रला सांगितले.
या घटनेनंतर रामचंद्र हा तणावाखाली गेला होता. जीवापाड प्रेम करूनही रेणुकाने विरोध केल्यामुळे त्याच्या डोक्मयात राग होता. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये वादावादीही झाली होती. शुक्रवारी सकाळी रेणुका राहत असलेल्या बसव कॉलनी येथे रामचंद्र गेला. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे रागाने धारदार शस्त्राने वार करून त्याने तिचा खून केला. खुनानंतर त्याने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती एपीएमसी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ हे आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती दोन्ही कुटुंबांना देण्यात आली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दुर्दैवी…
- प्रियकर-प्रेयसी दोघेही सौंदत्तीचे, एकाच समाजाचे
- प्रेयसीच्या घरच्यांचा प्रेमप्रकरणाला होता विरोध
- प्रेमभंगामुळे तणावाखाली गेल्याने केली प्रेयसीची हत्या
कुटुंबीयांचा आक्रोश…
मुला-मुलीकडच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर एकच आक्रोश केला. मुलाच्या वडिलांनी मुलाबद्दल माहिती देताना सांगितले, माझा मुलगा पीएसआय होणार होता. दोनच दिवसांपूर्वी त्याने मला फोन केला होता. मात्र या प्रेमाबद्दल त्याने कधीच सांगितले नाही. जर त्याने मला याबद्दल सांगितले असते तर निश्चितच यामधून मार्ग काढला असता. मात्र या घटनेमुळे आम्हाला धक्काच बसला असल्याचे त्यांनी सांगितले.