पैशांच्या व्यवहारातून संपविले जीवन
वार्ताहर / उचगाव
उचगाव येथील शेतकऱयाने शेतवडीतील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. 30 जून रोजी दुपारी बारा ते एकच्या सुमाराला घडली. भाऊबंदकीच्या शेतीच्या पैशांच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या मुलाकडून सांगितले जात होते.
या घटनेची अधिक माहिती अशी की, श्रीकांत शंकर जाधव (वय 56) हा सकाळी दहाच्या सुमाराला शेताकडे गेला होता. दुपारी तो घरी न आल्याने त्याची शोधाशोध सुरू असताना घराच्या गच्चीतून आंब्याच्या झाडाला मृतदेह लटकत असल्याचे निदर्शनाला आले.
गेल्या दोन-चार दिवसांपासून शेतीच्या पैशांच्या व्यवहारातून ते अस्वस्थ होते, असे त्यांचा मुलगा राजू यांच्याकडून सांगण्यात आले. सदर भाऊबंदकीचे भांडण व पैशांचा व्यवहार मिटविण्यासाठी त्यांनी गावातील प्रमुखांशी प्रयत्नही केल्याचे समजते. मात्र त्यांनी अखेर आत्महत्या केली. याचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत काकती पोलीस स्थानकाच्या अधिकारीवर्गाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयात नेल्याचे समजते. पुढील तपास पोलीस खात्याकडून केला जात आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता उचगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.