दहशत निर्माण करण्यासाठी छळवणूक : शेतकऱयांचा आरोप
प्रतिनिधी /सांगे
नियोजित आयआयटीच्या विरोधात काही दिवसांपूर्वी सभेचे आयोजन केलेल्या शेतकऱयांची सतावणूक करण्यासाठी आता प्रशासनाने खटले भरण्यास सुरुवात केली असल्याचा दावा सदर शेतकऱयांनी केला असून बुधवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकूण नऊ शेतकऱयांना समन्स बजाविण्यात आले. यावेळी शेतकऱयांची बाजू मांडण्यासाठी ऍड. स्लोम रॉड्रिग्स उपस्थित राहिले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जनतेला लोकशाहीने विचारस्वातंत्र्य दिले असून आपल्या भावना व्यक्त करणाऱयांना अशा प्रकारे समन्स बजाविणे म्हणजे दडपशाहीच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शेतकऱयांच्या वतीने बोलताना मिल्टन फर्नांडिस म्हणाले की, शेतकऱयांनी सर्व प्रकारची शासकीय परवानगी घेऊनच विचारविनिमय करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. यात शेतकऱयांची कोणतीही चूक नसताना केवळ शेतकऱयांत दहशत निर्माण करण्यासाठी सरकार अशा प्रकारे त्यांची छळवणूक करत आहे, असा आरोप त्यांनी केला. शेतकरी आपल्या हक्कांसाठी शांततापूर्ण पद्धतीने आपला लढा चालूच ठेवणार आहेत, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत विचारस्वातंत्र्य हिरावून घेण्याचा तसेच शेतकऱयांना समन्स पाठवून त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल संताप व्यक्त करून शेतकऱयांनी ‘आमच्यो जमनी आमका जाय’ अशा घोषणा उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिल्या.