केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ वा ‘अग्निवीर’ योजनेला मिळालेल्या व मिळणाऱया वाढीव व वाढत्या प्रतिसादामुळे योजनेला झालेला सुरुवातीचा विरोध झाकोळला गेला आहे. सैन्यदलांतर्गत ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत मिळणारा व मिळालेला वाढता प्रतिसाद याचेच द्योतक असतानाच विविध प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांनी ‘अग्निपथ’ योजना त्यांच्यादृष्टीने भविष्यात महत्त्वपूर्ण व विशेष स्वरुपात उपयुक्त ठरणार असल्याने या योजनांना आपला पाठिंबा जाहिरपणे व्यक्त केला आहे. यामुळे ‘अग्निपथ-अग्निवीर’ योजनांना मोठे पाठबळ प्राप्त होतानाच योजनांना होणारा विरोध नक्कीच मावळला आहे.
यासंदर्भात व्यवस्थापकीय कंपन्यांच्या मते भारतीय सैन्यदलांतर्गत तिन्ही संरक्षण दलांना शिस्त, क्षमता, कार्यक्षमता, नेतृत्व याची प्रदीर्घ व यशस्वी अशी परंपरा असून त्याची भलावण वेळोवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करण्यात आली आहे. त्याला आता ‘अग्निपथ’ द्वारा नवे व उपयुक्त स्वरुप दिले जात आहे. कंपन्यांच्या मते तिन्ही संरक्षण दलाच्या अग्निवीरांना त्यांच्या कौशल्य व गुणात्मक विकासाच्या दृष्टीने जे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचा मोठा फायदा कंपन्यांना तरुण व शिस्तीसह कौशल्य प्रशिक्षित उमेदवारांचा कर्मचारी म्हणून होणारा लाभदेखील मोठा असेल हा मुद्दा यासंदर्भात प्रामुख्याने मांडला आहे.
तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या वाढत्या गरजा व सैन्यदलातील शिक्षण-प्रशिक्षण व अनुभवाच्या संदर्भात सांगायचे म्हणजे सैन्यदलात प्रशिक्षण वा सेवा करणाऱयांमध्ये अधिकजण हे तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षितच नव्हे तर प्राविण्यप्राप्त असतात. वाहनांची दुरुस्ती व निगराणी, वायूदलातील विमान दुरुस्ती, नौदलातील तंत्रज्ञान व इंजिन हाताळणी या विशेष तांत्रिक बाबींशिवाय संरक्षण दलांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रचलित असणाऱया मालाची वाहतूक व हाताळणी, संदेशवहन, बांधकाम, आरोग्य सेवा वा प्रशासन अशा आणि या प्रकारचा अनुभव खासगी क्षेत्रातील कंपन्यांना अनुभवी कर्मचाऱयांच्या निवडीसाठी नेहमीच फायदेशीर ठरतो. बऱयाच मोठय़ा कंपन्या त्यामुळेच त्यांच्या प्रकल्प व्यवस्थापन, पायाभूत सुविधा व बांधकाम, प्रशासन, वाहतूक व्यवस्था अशा क्षेत्रातील अनुभवी जाणकार व मुख्य म्हणजे अनुभवी उमेदवारांच्या निवडीसाठी सैन्यदलात अल्पकालीन सेवा करून निवृत्त होणाऱया कर्मचारी, अधिकारी यांना नेहमीच प्राधान्य देतात. अग्निवीरांच्या संदर्भात पण हीच बाब निश्चितपणे व वेगळय़ा संदर्भात लागू होणारी ठरते.
सकृतदर्शनी पाहता सैन्यदलाच्या ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत शारीरिकदृष्टय़ा सक्षम व पात्रताधारक तरुणांना सैन्यदलाच्या तिन्ही विभागांतर्गत विविध प्रकारचे शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी साडेचार वर्षांचा असून त्यादरम्यान त्यांना वर नमूद केल्याप्रमाणेच सैन्यदलात विविध प्रकारचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर उपलब्ध प्रशिक्षणार्थी अग्निवीरांपैकी विशेष उल्लेखनीय पात्रताधारक सैन्यदलात सामावून घेतले जाणार असून उर्वरित उमेदवारांना प्रशिक्षणानंतर सैन्यदलात पुढील संधी मिळणार नसल्याने सेवामुक्त करण्यात येणार आहे व यावर बरीच चर्चा झाली आहे.
या संदर्भातील एक धोरणात्मक प्रशासकीय बाब म्हणून सर्वच अग्निवीरांना सैन्यदलात त्यांच्या प्रशिक्षणानंतर संधी मिळणार नाही ही वस्तुस्थिती असली तरी केवळ त्यामुळेच अग्निवीर योजनेचे गुणात्मक मूल्य कमी होत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कंपन्या वा औद्योगिक क्षेत्रात उमेदवारी प्रशिक्षण कायदा वा योजनेनुसार ज्याप्रमाणे नवागत उमेदवारांना त्यांच्या 1 ते 3 वषीय प्रशिक्षण कालावधीनंतर कायम नोकरीची शाश्वती नसली तरी त्यांच्या प्रशिक्षण काळातील कौशल्यामुळे इतरत्र नोकरीच्या मोठय़ा संधी उपलब्ध होतात तीच बाब अग्निवीरांना लागू होईल.
परिणामी प्रत्यक्षात सैन्यदलात पुढील संधी न मिळणाऱया वा न मिळालेल्या अग्निवीरांना त्यांच्या युवावस्थेत व आयुष्याच्या सुरुवातीच्या व महत्त्वाच्या टप्प्यात सैन्यदलातील शिस्तबद्ध प्रशिक्षणाशिवाय संबंधित तांत्रिक ज्ञान-प्रशिक्षण-सराव याद्वारा कौशल्य विकासाचा महत्त्वपूर्ण फायदा होणार आहे. नव्या संदर्भात या प्रशिक्षणाला संगणकीय प्रणाली व अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार असून अशा विशेष व महत्त्वपूर्ण प्रशिक्षण झालेल्या उमेदवारांचा फायदा संबंधित उमेदवारांनाच नव्हे तर कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवस्थापन व कंपन्यांना निश्चितपणे होणार असून त्यामुळेच खासगी क्षेत्रातील मोठय़ा व्यवस्थापन कंपन्यांनी अग्निवीर योजना व अग्निवीरांचे केवळ स्वागतच केले असे नव्हे तर या योजनेच्या पुढील योजनेचा अवलंब करण्यासाठी आपले कृतीशील समर्थन देऊ केले आहे.
यासंदर्भात विशेष उल्लेखनीय बाब म्हणून सांगायचे म्हणजे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या मते ‘अग्निपथ’ हा तरुणाईला शिस्त व कौशल्य विकासाचा मार्ग दाखविणारा उपक्रमच नाही तर त्याद्वारा देशाच्या उद्योग आणि औद्योगिक क्षेत्राला शिस्तबद्ध, प्रशिक्षित व तांत्रिक क्षेत्रातील प्रगत ज्ञान असणारे युवा उमेदवार मिळण्याचा मोठा फायदा होणार आहे.
‘महिंद्र’चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अग्निपथ व अग्निवीर यासारख्या केंद्र सरकारच्या नव्या व आगळय़ा वेगळय़ा उपक्रमाला सुरुवातीच्या टप्प्यात व मूळ विषय समजून न घेताच झालेल्या आक्रस्ताळय़ा विरोधाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ‘महिंद्र’ मध्ये प्रशिक्षित अग्निवीरांची आवर्जुन निवड करण्यात येईल, असे आपले धोरण स्पष्ट करीत असतानाच अग्निवीरांचे नेतृत्व, शारीरिक क्षमता, शिस्त व सामूहिक काम करण्याची प्रवृत्ती या कौशल्य गुणांचे आम्ही आवश्य स्वागत करू असे आनंद महिंद्रा यांनी नमूद केले आहे हे विशेष.
‘जेएसडब्ल्यू’ गटाचे अध्यक्ष नवीन जिंदल यांच्यानुसार समाजातील नकारात्मक वृत्ती आणि प्रवृत्तींनी अग्निपथ योजनेमुळे समाजातील युवा वर्गाचे व त्याद्वारे देशाचे लष्करीकरण करण्याचा घाट असल्याचा अनाठायी प्रचार करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र या प्रशिक्षणाद्वारे युवकांना प्रशिक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने संघटित करण्यात येणार असल्याने देश व समाजाचा अविभाज्य भाग असणाऱया औद्योगिक क्षेत्राला त्याचा लाभ अपरिहार्यपणे होणार आहे.
‘आरपीजी’ उद्योग समूहाचे अध्यक्ष व्ही. गोयवळा यांनी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ चे स्वागत केले असून अग्निवीरांचे स्वागत करण्याची सहर्ष तयारी दाखविली असून अशीच धारणा बायोकॉनच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका किरण शॉ मुजूमदार यांनी व्यक्त केली आहे.
यासाऱया पार्श्वभूमीवर निवडक व विशिष्ट उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या गट समुहांनी सरकारच्या अग्निपथ व अग्निवीर या विशेष योजनांना केलेल्या विरोधाचा फोलपणा साऱयांसमोर आला असून उद्योग प्रमुखांच्या ठोस समर्थनाने योजनांना मोठे पाठबळ लाभले आहे.
दत्तात्रय आंबुलकर