ऑनलाईन टीम/तरुण भारत
Supreme Court on Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीचा प्रश्न काही महिन्यांपासून रखडलेला आहे. या मुद्द्यावरुन आज सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलीय. तसेच सुप्रीम कोर्टानं राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवर स्थगिती कायम ठेवली आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारला (shinde-fadnavis government) मोठा धक्का बसला आहे. याशिवाय कोर्टानं या प्रकरणात राज्य सरकारलाही बाजू मांडण्याचे आदेश दिले असून या प्रकरणाची सुनावणी पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकारने पाठवेली १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मंजूर केली नव्हती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. याचसंदर्भात आता सुप्रीम कोर्टाने पुढच्या सुनावणीपर्यंत स्थगिती कायम ठेवली आहे. राज्यपालांनी आपलं म्हणणं सादर न केल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारची देखील कोर्टाने कानउघडणी केली. नोटीस देवूनही शपथपत्र दाखल न केल्याने खडेबोल सुनावले.
हे ही वाचा : ठाकरेंच्या ‘मशाली’नंतर शिंदेंची ‘ढाल-तलवार’ही वादाच्या भोवऱ्यात
कोर्टात झालेल्या सुनावणीत पुढील आदेश येईपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय या प्रकरणाची सुनावणी येत्या १६ नोव्हेंबरला पुन्हा होणार आहे. याची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश केएम हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.