प्रेषित प्रकरणी सर्व तक्रारी एकत्र, अटकेपासून संरक्षण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात टिप्पणी केल्याचा आरोप असणाऱया भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात देशात अनेक स्थानी नोंद झालेल्या तक्रारींचे एकत्रीकरण करुन या सर्व तक्रारींची चौकशी दिल्ली पोलिसांनी करावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना अटक करण्यात येऊ नये, असा महत्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिला.
न्या. सूर्यकांत आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांनी हा आदेश बुधवारी दिला. शर्मा यांनी सर्व प्रकरणे एकत्र करुन त्यांची सुनावणी एका पोलीस स्थानकात केली जावी, अशी मागणी करणारी याचिका सादर केली होती. अशाच याचिकेवर प्रारंभी सुनावणी करताना न्यायालयाने शर्मा यांच्यावर अनेक गंभीर टिप्पण्या केल्या होत्या. तसेच सारा देश पेटविण्याला त्या जबाबदार आहेत, असेही तोंडी ताशेरे ओढले होते. त्यानंतर शर्मा यांचे विधीज्ञ मणिंदरसिंग यांनी याचिका मागे घेतली होती.
मिळाला अपेक्षित दिलासा
एका आरोपीविरोधात एकाच प्रकरणात अनेक ठिकाणी तक्रारी सादर झाल्या असतील तर त्या एकत्र करुन प्रथम ज्या पोलिस स्थानकात तक्रार सादर झाली त्या पोलीस स्थानकाला या सर्व तक्रारींची चौकशी करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी आरोपीच्यावतीने केली गेल्यास न्यायालयाने ती मान्य करण्याचा प्रघात आहे. कायद्यानुसार तसा आरोपीचा अधिकारही आहे. मंगळवारी शर्मा यांची याचिका मान्य करताना न्यायालयाने त्यांना अपेक्षित दिलासा दिला.
अटकेपासूनही संरक्षण
दिल्ली येथील पोलिसांनी शर्मा यांच्या विरोधातील या प्रकरणातील तक्रारींची एकत्रित चौकशी करावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना अटक करण्यात येऊ नये, असाही आदेश न्यायालयाने दिल्याने शर्मा यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता कठोर कारवाई पोलिसांना करता येणार नाही.
तक्रार रद्द करुन घेण्यासाठी…
याच याचिकेत नुपूर शर्मा यांनी आपल्या विरोधातील या प्रकरणातील सर्व तक्रारी रद्द करण्यात याव्यात अशीही मागणी केली होती. तक्रारी रद्द करण्याविषयीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात त्या सादर करु शकतात, अशी मुभाही त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिली आहे. त्यामुळे त्या तशी याचिका सादर करण्याची शक्यता आहे. साधारणतः तीन महिन्यांपूर्वी नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही वृत्तवाहिनीवरील चर्चेत भाग घेताना इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांच्यासंबंधी काही टिप्पणी केली होती. त्यामुळे देशात आणि भारताबाहेरही निषेध करण्यात आला होता. भारतात अनेक ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली होती.