प्रतिनिधी / कराड :
राज्यात सध्या विरोधी नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. त्यांच्या आरोपांना महाविकास आघाडी सरकार उत्तर देत आहे. मात्र विरोधक वाढत्या महागाईवर (rising inflation) काही बोलत नाहीत त्यांनी राज्य सरकारवर आरोप करून आणि समाजात तेढ वाढवण्यापेक्षा महागाईवर बोलावे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी व्यक्त केली.
कराड येथे सुळे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी सुळे म्हणाल्या, महागाईचा प्रश्न प्रत्येक कुटूंबाला सतावत अससताना हा मुद्दा भरकटवण्यासाठी नको ती भाषणे केली जात आहेत. अर्थात लोकशाही आहे भाषणे करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सध्या कोरोनानंतर जनमाणसाला महागाईची झळ बसत आहे. यावर राज्य सरकार असो किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस महागाईवर काय उपाययोजना करता येईल यावर आमच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सध्या कोण काय बोलतेय याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. आम्ही जनतेशी बाधिलकी जपली आहे. या बांधिलकीच्या नात्यानेच आम्ही महागाईच्या प्रश्नावर केंद्र सरकारशी चर्चा करत आहोत. दरम्यान सदानंद सुळे यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्याचा गैरअर्थ काढून ती ईडीची नोटीस असल्याच्या अफवा उठवल्या गेल्या. मात्र आयकर विभागाच्या नोटीसीला आम्ही उत्तर दिले असून सुळे कुटूंबिय यावर लढत आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार शशिकांत शिंदे, लोकशाही आघाडीचे नेते जयंत पाटील, सारंग पाटील, युवा नेते सौरभ पाटील, जयंत बेडेकर, प्रमोद शिंदे यावेळी उपस्थित होते.