पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
अतिवृष्टीमुळे पीकहानी मोठय़ा प्रमाणात झाली आहे. त्याचा सर्व्हे करताना शेतकऱयांचे हित जपण्याकडे अधिक लक्ष द्या, जॉईंट सर्व्हेनंतरही पुन्हा पीकहानी झाली आहे. त्यामुळे त्याचाही सर्व्हे शेतकऱयांच्या उपस्थितीतच करावा, अशा सूचना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना केल्या आहेत.
सरकारी वसती धाम येथे अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही सूचना केली. जिह्यामध्ये 400 कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एनडीआरएफनुसार आतापर्यंत 105 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल आला आहे. मात्र, अजूनही सर्व्हे करायचा असून हा आकडा वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
जिह्यातील अधिकाऱयांनी काम अत्यंत जलदगतीने केले आहे. त्वरित भेट देऊन नुकसानभरपाई दिली आहे. घरांची पडझड झालेल्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात आली आहे, हे कौतुकास्पद असून अधिकाऱयांचे अभिनंदन पालकमंत्र्यांनी केले आहे. पीकहानी तसेच घरांची पडझड झालेल्यांमध्ये बोगस प्रकरण घुसडले जाऊ नये याकडे अधिकाऱयांनी लक्ष द्यावे, असेही अधिकाऱयांना सांगितले.
जुलै-ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या पिकांचे तसेच घरांच्या पडझडीसंदर्भात 17.1 कोटी रुपये संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. 678 घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात आले आहेत. जूनमध्ये 21 टक्के पाऊस कमी झाला. मात्र, जुलैमध्ये 41 टक्के पाऊस अधिक झाला आहे. ऑगस्टमध्ये 39 टक्के पाऊस अधिक झाला आहे. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
नवीन हॉस्पिटलची उभारणी करा
सीमाभागातील जनता उपचारासाठी परराज्यांमध्ये जात आहे. या ठिकाणी सोय नसल्याचे कारण पुढे करून हे रुग्ण इतर राज्यांमध्ये जात आहेत. त्यामुळे सीमाभागामध्ये नवीन अत्याधुनिक हॉस्पिटलांची निर्मिती करण्यासाठी आराखडा तयार करा. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना सांगितले.
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी 30 कोटी अतिरिक्त अनुदान
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग मंजूर झाल्यानंतर त्याच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी या मार्गासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून 30 कोटी रुपये अतिरिक्त मंजूर करण्यात आले आहेत, असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.
मृत पावलेल्या 5 जणांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई
भिंत तसेच झाड कोसळून आणि विजेच्या तारा तुटून पाच जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या त्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी यावेळी दिली. तातडीने नुकसानभरपाई दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱयांचे अभिनंदन केले आहे.
या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी रविंद करलिंगण्णावर, शशीधर बगली, कृषी अधिकारी शिवनगौडा पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.