देवेंद्र फडणवीस गुजरातचे उपमुख्यमंत्री असल्याचा टोला
प्रतिनिधी/कोल्हापूर
सत्तांतरानंतर भाजपकडून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे धोरण नियोजनबद्धरित्या राबविले जात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला महाराष्ट्रापासून तोडता येत नसल्याने तिचे महत्व कमी करण्यात येत आहे. राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जाणीवपूर्वक नेले जात आहेत, अस्थिरतेमुळे नवीन गुंतवणूकदारही राज्यात प्रकल्प उभारणी, गंतवणूक करण्यास टाळत आहे, त्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर जाण्याचा धोका निर्माण आहे. या सर्व गोष्टी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सध्या राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने अंधारे बुधवारी कोल्हापूर दौऱयावर आल्या होत्या. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाळी, जिल्हाप्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले उपस्थित होते.
सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, राज्यातील सत्तांतर हे एकटय़ा फडणवीस यांचे काम नाही. दिल्लीतील महाशक्तीने ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यासारख्या स्वायत्त संस्थांचे कवच दिल्याने सत्तांतर शक्य झाले. लोकांमध्ये घुसा, त्यांच्यात फूट पाडा हे फडणवीस यांचे धोरण आहे. तीच नीती त्यांनी अवलंबिली. चाळीस जण फोडले पण ते धनुष्यबाणावर निवडून आलेले आहेत, त्यामुळे फडणवीस यांचे वेगळे काही कर्तृत्व नाही, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.
फडणवीस यांच्या गृहखात्याचा कारभार पक्षपाती
गर्दीत ताई बाजूला व्हा, असे सांगणाऱया जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला जातो. मंदिरात, बसमध्ये पुजारी, कडंक्टर जेव्हा महिलांना ताई पुढे सरका म्हणतो, तेंव्हा तो विनयभंग होतो काय? असा सवाल करत अंधारे यांनी आव्हाडावरील कारवाईमागे गृहमंत्री फडणवीस यांची सूडबुद्धी आणि पक्षपातीपणा दिसतो. फडणवीस शिंदे-भाजप सरकारचे गृहमंत्री नाहीत तर राज्याचे आहेत. त्यांना महिलांबद्दल अनुद्गार काढणारे अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील ही मंडळी दिसत नाहीत. वास्ताविक विनयभंगांची व्याख्या काय आहे, हे फडणवीस यांना शिकविले पाहिजे, असेही अंधारे यांनी सांगितले.
भावना गवळी, प्रताप सरनाईक यांच्यावर चार्जशीट दाखल नाही
ईडीकडून चौकशी झालेल्या खासदार भावना गवळी आणि आमदार प्रताप सरनाईक शिंदे गटात सामिल झाले. ईडीकडून त्यांच्याविरोधात कोणतीही चार्जशिट दाखल करण्यात आलेली नाही. भाजपही या दोघांना कोणत्या आधारावर क्लिनचिट देत आहे, असा सवाल करत अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि ईडीच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वंचिताचा युतीबाबत प्रस्ताव आलेला नाही
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट होणार असेल युती झाली असे नाही. वंचितकडून अजून तसा प्रस्ताव आलेला नाही. आला त्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे अंधारे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सुषमा अंधारे म्हणाल्या…
-अनिल परब यांचा बंगला पाडा म्हणणारे किरीट सोमय्या नारायण राणेंचा बंगला पाडण्याचे न्यायालयाचे आदेश असताना गप्प का?
-बीकेसीवर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात करोडो रूपयांचा चुराडा कशातून झाला?, यावर किरीट सोमय्या कधी बोलणार?
-उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दुप्पट आमदार निवडून येतील.
-हिंदूत्व आईसारखे… ती दाखविण्याची गोष्ट नाही.
-सर्व पातळ्य़ावरील अपयशामुळे भाजपकडून हिंदुत्वाचे मार्केटिंग
-2023 मध्ये महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील.