ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि फुले-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी लढणारे सैनिक माझ्यासोबत आले. संकट काळात सोबतीलाच महत्त्व आहे, अशी भावना व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी अंधारे यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, लढाई ऐन भरात असताना लढणारे सैनिक माझ्यासोबत आले. संकटात असताना जे सोबत असतील त्यांना महत्त्व असते. शिवसेनेची कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहेच. स्वतःला पुरोगामी म्हणणारे खरंच पुरोगामी आहेत का? लोकशाही वाचवणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टचा निकाल हा शिवसेनेच्या भविष्यासाठी नाही, तर या देशात लोकशाही राहणार का हेदेखील कळणारा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करुन संविधानिक चौकट तोडली जात आहे. अशा वेळी भाजपसोबत लढणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा मी निर्णय घेतला. माझ्या डोक्मयावर कुठल्याही ईडीचं ओझं नाही आणि मला कुठलेही प्रलोभन नाही. मला अजून पीठ-मिठाचे मातोश्रीमधील डबे माहित नाही, मी नवीन आहे. नीलमताई माझ्यासाठी आईप्रमाणे आहेत. त्या मला सांभाळून घेतील.
मी आत्तापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून जो लौकिक मिळाला आहे. त्यानुसार मी काम करत राहिन. आज जोरजोरात रडायचं आणि उद्या दुसऱ्या गटात सामिल व्हायचं हे माझ्याकडून होणार नाही. यापूर्वी मी शिवसेनेवर टीका केली होती. पण, आमचा एकच संविधानिक शत्रू असेल तर मी त्यांचे नेतृत्व करायला तयार आहे असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा : राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको