शिवसेनेचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन
म्हासुर्ली / वार्ताहर
धामणी नदीवरील बळपवाडी (ता.पन्हाळा) ते गवशी – पाटीलवाडी (ता. राधानगरी) दरम्यानचा शेतकऱ्यांनी स्वखर्चातून घातलेला मातीचा बंधारा पाण्याच्या प्रचंड दाबामुळे फुटला.परिणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर हेच जबाबदार असून त्यांना निलंबित करावे.तसेच बंधाऱ्याचा संपूर्ण खर्च पाटबंधारे खात्यामार्फत देणेत यावा.अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी अधिक्षक अभियंता महेश सुर्वें यांच्याकडे पीडीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह निवेदनाद्वारे केली आहे.
धामणी खोऱ्यात हरितक्रांती घडविण्यास उपयुक्तत ठरणारा राई (ता.राधानगरी) येथील धामणी प्रकल्पाचे काम गेली २२ वर्षे रखडले आहे.तर धामणी नदीवर असलेले कोल्हापूर पध्दतीचे बंधारे कुचकामी ठरत आहेत.मार्च महिन्यात धामणी नदी पाण्याविना कोरडी पडते. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो.
धामणी नदीवर राई (ता. राधानगरी) ते आंबर्डे (ता.पन्हाळा) दरम्यान शेतकरी लाखो रुपये स्वखर्च करुन सर्व कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यास समांतर मातीचे बंधारे उभारून तर काही ठिकाण पूर्णतः मातीचे बंधारे जेसीबी मशीन,ट्रॅक्टरचा वापर करुन बांधतात.व शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा करतात. अशाच प्रकारे शेतकऱ्यांनी बळपवाडी ते गवशी – पाटीलवाडी दरम्यान स्वखर्चाने बांधलेला मातीचा बंधारा शनिवारी सकाळी सात वाजता वरुन आलेल्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे फुटला. त्यामुळे चार गावातील शेतकऱ्यांचा पिण्याचा व शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहेे.
बंधारा फुटीमागे गत आठवड्यात पाटबंधारे विभागाने अचानक धामणी नदीवर लागू केलेली पाणी उपसा बंदीच कारणीभूत आहे.उपसा बंदीमुळे वरील बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी गवशी – पाटीलवाडी बंधाऱ्यात आले.त्यातच या बंधाऱ्याच्या खालील बंधारा रिकामा असल्याने, सदर बंधाऱ्यावर पाण्याचा प्रचंड दाब वाढला. व त्याचे रूपांतर मातीचा बंधारा फुटण्यास कारणीभूत ठरला.”
परिणामी दोन्ही तीरावरील कृषी विद्युत पंप पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.तसेच पाणी वाहून गेल्याने येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.असे निवेदनात म्हटले आहे.सदरचे निवेदन मध्यम प्रकल्प क्रमांक- २ चे कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील यांनी विजय देवणे व शेतकरी शिष्टमंडळाकडून स्विकारले. यावेळी गणपती मुळये, बाजीराव सुतार, रामचंद्र भित्तम, धोंडीराम पाटील, आनंदा बळीप, हिंदुराव भित्तम, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.