माणूस त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी चांगले भविष्य तयार करण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करीत असतो. एक चांगले आयुष्य घडविण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी तो पार पाडतो. मग ते लहानपणापासून शरीरासाठी योग्य पोषण देणे असो, उत्तम शिक्षण प्राप्त करणे किंवा पुरेशी संपत्ती कमवून चांगले घर बनवणे असो. माणूस आवश्यक त्या सर्व गोष्टी करतो आणि एक परिपूर्ण आयुष्य घडवतो. या सर्व गोष्टींची जबाबदारी पार पडताना तो आणखी एक मोठी जबाबदारी कळत नकळत पार पाडत असतो आणि ती म्हणजे एका जबाबदार नागरिकाची. प्रत्येक जबाबदार नागरिक कर भरून, वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावून आजूबाजूच्या परिसरात एक चांगली व्यवस्था राखण्याचा प्रयत्न करतो.
पण, शहर आणि देशाचे रहिवासी असण्याबरोबरच, आपण या सुंदर पृथ्वीचेदेखील रहिवासी आहोत हे विसरून चालणार नाही. या पृथ्वीची आणि त्यावरील प्रत्येक घटक जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. निसर्ग ही देवाने मानवजातीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्यातील प्रत्येक घटक आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे. जागतिकीकरणामुळे आपले जीवन अतिशय सोपे झाले आहे. माणसाला एक आरामदायी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट आज आपल्याकडे सहजपणे उपलब्ध आहे. नुसतीच उपलब्ध नाही तर रोजच्या आयुष्यात लागणाऱया गोष्टींसाठी माणसाकडे आज अनेक पर्यायदेखील उपलब्ध आहेत. जसे की दूध. या आधी आपण फक्त गाईचे किंवा म्हशीचे दूध प्यायचो. पण आता त्याचबरोबर आपल्याला सोया, बदाम, ओट्सपासून बनवलेले दूधसुद्धा बाजारामध्ये मिळते. त्याच बरोबर अनेक प्रकारची यंत्रे, कपडे, वाहनेदेखील आपल्या आजूबाजूला मिळतात. या गोष्टींचा फायदा असा आहे की ते मनुष्यासाठी जीवन अधिक सोपे आणि सुलभ बनवतात.
पण त्याचबरोबर, बऱयाच मानवनिर्मित गोष्टी अशा आहेत ज्या अविनाशी आहेत. म्हणजेच त्यांचा वापर जरी संपला तरी त्या गोष्टी कधी नष्ट होऊ शकत नाहीत. या गोष्टी पृथीतलावर कचरा म्हणून पडून राहतात. 789 कोटी माणसं रोज अनेक अशाच अविनाशी गोष्टी वापरतात आणि फेकून देतात तेव्हा तो कचरा वाढत जातो. बऱयाच ठिकाणी असा कचरा टाकण्यासाठी काही एकर जागा नेमली गेली असते तर काही वेळेला हाच कचरा समुद्रात फेकला जातो. जर या वाढत्या कचऱयाला वेळेत लगाम नाही लावला, तर निसर्गाची तर हानी होईलच, पण त्याचबरोबर माणसाचे जीवन खूप कठीण होऊन बसेल. पण अजूनही वेळ गेलेली नाही. रोजच्या आयुष्यात पुढे सुचवल्याप्रमाणे काही छोटे बदल जरी केलेतरी आपण निसर्गाची आणखी हानी होण्यापासून थांबवू शकतो आणि आपल्या पृथ्वीला खराब होण्यापासून वाचवू शकतो.
झाडे आपल्याला जीवन देतात कारण ती जगण्यासाठी सर्वात आवश्यक असलेल्या घटकांपैकी एक घटक बनवतात. तो घटक म्हणजे ऑक्सिजन किंवा प्राणवायू. विविध कारणांमुळे दररोज हजारो झाडे तोडली जातात. जर प्रत्येकाने झाडापासून बनणाऱया वस्तूंचा वापर थोडा कमी केला आणि त्याऐवजी एक एक झाड जरी लावले तरी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढेल.
प्लास्टिक पूर्णपणे मानवनिर्मित आहे आणि प्लास्टिकचा पुनर्वापर होऊ शकत नाही किंवा विघटनही केले जाऊ शकत नाही. आज प्रत्येक गोष्टीमध्ये प्लास्टिकचा वापर होतो. चॉकलेटच्या अवरणापासून ते यंत्रांपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो. दरवषी सुमारे 300 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा तयार होतो आणि हा कचरा अनेक वर्षे आपल्या पृथ्वीवर असाच पडून राहणार आहे. एक जागरूक नागरिक म्हणून आपण हे नियंत्रणात आणण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी किंवा बंद केला पाहिजे. फार काही मोठे पाऊल उचलले पाहिजे असे नाही, तर छोटय़ा छोटय़ा गोष्टींद्वारे आपण प्लास्टिक कचरा कमी करू शकतो. प्लास्टिक पिशव्या, स्ट्रॉ, भांडी, कप, इत्यादी गोष्टींचा वापर बंद करून जास्ती टिकाऊ गोष्टीं सर्वानीच वापरल्या तर पर्यावरणाची हानी होण्यापासून आपण थांबवू शकतो.
जेव्हा आपण बाहेर हॉटेल किंवा समारंभात खातो तेव्हा दररोज बरेच अन्न वाया जाते. खूपदा जेव्हा आपण मागवलेले अन्न पूर्ण खाऊ शकत नाही, तेव्हा आपण ते तसेच सोडतो आणि मग ते कचऱयात जाते. पण जर तेच अन्न आपण बांधून घेतले आणि एखाद्या भुकेलेल्याला दिले तर ते वाया जाणार नाही आणि एखाद्याची भूकसुद्धा आपण शमवू शकतो. सोशल मीडियाच्या दुनियेत सगळय़ांनाच चांगले दिसायचे असते. त्यामुळे गरज नसतानादेखील आपण सारखे नवीन कपडे विकत घेतो. या काळात कापडी कचरादेखील एक मोठी समस्या आहे. अशा वेळेला न लागणारे कपडे फेकून देण्याऐवजी आपण दान केले तर कचरा कमी होईलच पण त्याचबरोबर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याचे आपल्याला पुण्यपण लागेल.
असे अनेक मार्ग आहेत ज्यात आपण जास्त प्रयत्न न करता पर्यावरण वाचविण्यात हातभार लावू शकतो. आपल्याला कोणतेही अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नाही. जेव्हा वापरात नसेल तेव्हा घरातले दिवे बंद करणे असो किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे असो, प्रत्येक जाणीवपूर्वक प्रयत्न पर्यावरण वाचवण्यात हातभार लावू शकतो. या छोटय़ा प्रयत्नांद्वारे, आपण दरवषी केवळ बऱयाच पैशाची बचतच करू शकत नाही, तर ज्या निसर्गाने आपल्याला हे जीवन प्रदान केले आहे त्या निसर्गाबद्दलही आपण आपला आदर व्यक्त करू शकू. जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की येणाऱया पिढीसाठी आपण जग सुंदर, निरोगी आणि सुखकर बनवू. एकदा खूप उशीर झाला की, कितीही पैसा किंवा समृद्धी या पृथ्वीला वाचवू शकणार नाही. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या कृतींबद्दल जागरूक राहूया आणि चांगल्या भविष्यासाठी शाश्वत जीवनशैली स्वीकारूया!
-श्राव्या माधव कुलकर्णी