रास्तारोको करून ठिय्या आंदोलन : दुरुस्तीसाठी 20 सप्टेंबर डेडलाईन, सीमेवर पोलीस छावणीचे स्वरुप, आश्वासनानंतर आंदोलन मागे
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवरील बाची-शिनोळी या सीमेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनस्थळी बेळगाव सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदर रस्ता आठवडाभरात दुऊस्त करून देण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर दोन तास चाललेले रास्तारोको आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. बेळगाव-वेंगुर्ला हा तीन राज्यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यात याच मार्गे ये-जा सुरू असते. मात्र गेल्या एक वर्षापासून या रस्त्याकडे सातत्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे आणि लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
या रस्त्यावरून रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डेच खड्डे झाल्याने हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. सदर रस्ता पार करण्यासाठी प्रवाशांना बराच विलंब लागतो. अनेकांची वाहने या खाड्यांमध्ये अडकून नादुऊस्त झाली आहेत. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे खाड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेक प्रवासी जखमी झाल्याच्याही घटना ताज्या आहेत. यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली या भागातील अनेक प्रवासी, नागरिकांनी हे आंदोलन छेडले. सदर आंदोलन छेडण्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली होती. त्यानुसारच शुक्रवारी हे आंदोलन छेडले आणि बेळगाव सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आणली. सदर खाते खडबडून जागे झाले आणि आंदोलनस्थळी भेट देऊन रस्त्याची तातडीने दुऊस्ती करण्याचे आश्वासनही दिले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अखेर हे आंदोलन मागे घेतले.
आठ दिवसांत रस्ता झाला पाहिजे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारीवर्गाला ठासून सांगितले आहे की, जर आठ दिवसांच्या आत रस्त्याची दुऊस्ती झाली नाही तर सार्वजनिक बांधकाम खात्याला, बेळगावला येऊन घेराव घालून जाब विचारला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
रस्त्यामुळे दीड-दोन तासांचा विलंब
‘आंदोलन म्हटलं की पोलीस दंडोका घेतात. मग रस्ता दुऊस्तीसाठी पीडब्ल्यूडी फावडे, बुट्टी का घेत नाही.’ रास्तारोको केले की पोलीस धावत येतात. आणि येताना हातात दंडोका घेऊन येतात. मग रस्ता दुऊस्तीसाठी आंदोलन छेडल्यानंतर, वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी, अधिकारी आपल्या पीडब्ल्यूडी खात्याकडून फावडा, बुट्टी आणून रस्त्याची तातडीने दुऊस्ती का केली जात नाही, असा खोचक प्रश्न शिनोळीचे सामाजिक कार्यकर्ते मोनाप्पा पाटील यांनी विचारला. तसेच शिनोळी ते बेळगाव हे अंतर पास करण्यासाठी दीड ते दोन तासांचा विलंब लागतो. इतक्मयाच वेळेत आम्ही कोल्हापूरला जाऊन पोहोचू शकतो, हे येथील लोकप्रतिनिधी आणि शासनाला कसे कळत नाही, असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला.
दोन्ही राज्यांचा पोलीस फाटा सज्ज
शुक्रवारी बाची-शिनोळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येणार याची कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांना माहिती असल्याने चंदगड पोलीस स्टेशनचा पोलीस फाटा तसेच वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अर्धातास अगोदरच आंदोलनस्थळी हजर झाले होते.
बेळगाव-बाची रस्त्याकडे दुर्लक्ष
रायचूर ते बाची हा कर्नाटकातील रस्ता होऊन अनेक वर्षे लोटली. मात्र सदर रस्ता होत असताना, बेळगाव-बाची हा मार्ग बेळगावच्या पश्चिम भागातील मराठी नागरिकांचा भाग म्हणून वगळण्यात आला की काय? असाही संशय या आंदोलनस्थळी सुरू होता. बेळगाव-रायचूर रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले. मात्र बेळगाव-बाची हा रस्ता करण्याचे काम रेंगाळले आणि याचा नाहक त्रास प्रवासीवर्गांना आजतागायत सहन करावा लागत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे प्रा. दीपक पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, शामराव बेनके, विजय भांदुर्गे, पांडुरंग बेनके, शिनोळी खुर्दचे सरपंच परशराम पाटील, शिनोळी बुद्रुकचे सरपंच गणपत पाटील, पुंडलिक गौसेकर, मोनाप्पा पाटील, परशराम मनोळकर, विलास तुपारे, यल्लाप्पा पाटील, दौलत मेणसे याबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बेळगाव-चंदगड चौपदरीकरण तातडीने व्हावे
बेळगाव ते चंदगड मार्गाचे चौपदरीकरण तातडीने करण्यात यावे. यासाठी शासनाने तातडीने पाठपुरावा करून चौपदरीकरण रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर गती द्यावी आणि तीन राज्यांना जोडणारा हा महामार्ग लवकर पूर्ण करावा, अशी ही मागणी जोर धरू लागली आहे.