‘नवा जुना प्रकार न करता एकत्र आल्याची खरेदी करण्याची मागणी
वाठार किरोली : तारगाव (ता. कोरेगाव) येथे कृष्णा नदीवर आल्याचे नवे-जुने अशी विभागणी करून सुरू असलेली धुणी बंद पाडत व्यापाऱ्यांनी एकत्रित खरेदी घेण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाग पाडले आहे. यापुढे विभागणी करून खरेदी केल्यास आम्ही नुकसानीस जबाबदार राहणार नसल्याचा इशारा संघटेनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.
वाठार (ता. कोरेगाव) आले खरेदीदार व्यापारी व शेतकरी यांच्या बैठक घेऊनही आले खरेदीत नवा जुना असा प्रकार न करता एकत्रित आल्याची खरेदी करावी, असा निर्णय झाला होता. या प्रकारच्या काशीळ, नागठाणे आदी ठिकाणी बैठका झाल्या होत्या. मात्र अनेक व्यापाऱ्यांकडून हा निर्णय न जुमानता नवे-जुने विभागणी करून आले खरेदी केली जात होती. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेस माहिती मिळाल्यावर स्वाभिमानी संघटेनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या ‘स्वाभिमानी’च्या पुढाकाराने आले खरेदीदार व शेतकऱ्यांच्यात बैठक झोलक घेऊन एकमताने एकत्रित आले खरेदीचा निर्णय झाला होता.
नवे-जुने करून व्यापाऱ्यांकडून दरात भेदभाव करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात होता. पुणे, सातारा, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने आले खरेदीची अंमलबजावणी करावी, अन्यथा स्वाभिमानीला रस्त्यावर उतरावे लागेल. व्यापाऱ्यांनीही पंरपरेप्रमाणे आल्याची एकत्रित खरेदी करावी, विनाकारण वाकड्यात जाऊ नये. अशी समज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे.
अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, दत्तूकाका घार्गे, विकास गायकवाड, दिनेश बर्गे, सुरेश फाळके, हणमंत जगदाळे, किरण साळुंखे, पंढरीनाथ गायकवाड, तानाजी पाटील, राजकुमार गायकवाड, श्रीधर पिंगळे, उमेश गायकवाड, दिपकी सुडके आदींनी तारगाव येथील आले धुणी बंद पाडली. निर्णय होऊनही तुम्ही विभागणी शेतकऱ्यांची लुट करत असल्याचा प्रश्न उपस्थित केला.
या वेळी ‘स्वाभिमानी’च्या आक्रमक भूमिकेनंतर खरेदीदार व्यापाऱ्यांनी हा जुना सौदा असल्याने माफीनामा देऊन माल खरेदी केला आहे. या पुढे आल्याची विभागणी न करता खरेदी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांना आले घेऊन जाण्यास मान्यता देण्यात आली. यावेळी श्री. पवार म्हणाले,वाठार किरोली येथे व्यापारी आणि शेतकरी व स्वाभिमानी संघटना यांचा नुकताच मेळावा झाला होता. यामध्ये विभागणी न करता आले खरेदीची भूमिका व्यापाऱ्यांनी मान्य केली. मात्र तारगाव येथे विभागणी केली जात असतनाच आम्ही रंगेहाथ पकडले आहे. हा सौदा जुना असल्याने माफी मागितल्याने सोडण्यात आले. मात्र पुढील काळात आल्याची एकत्रित खरेदी करावी आणि खरेदीदार व्यापाऱ्यांनी आपली लायन्सेस काढून घ्यावीत अशी मागणी केली आहे.