शिरोळ प्रतिनिधी
कर्नाटक शासनाच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयास विरोध करण्यात यावा या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांना देण्यात आले.
कर्नाटक राज्य सरकारने अलमटी धरणाची उंची वाढविण्याचा घाट घातला आहे. नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अलमटी धरणाची उंची कोणत्याही परिस्थितीत वाढविणार असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारने कडाडून विरोध केला पाहिजे. सध्या अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटर आहे. ती त्यांनी ५२४ करून ५ मीटरने वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्याला नेहमीच महापुराचा फटका बसणार आहे शिवाय यापूर्वी शिरोळ तालुका चार वेळा आलेल्या महापुराने उद्ध्वस्त झाला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास शिरोळ तालुका पूर्णतः कायमस्वरूपी पाण्याखाली जाईल. तालुक्यातील शेती उद्ध्वस्त होईल. धरणाची उंची वाढवल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा कायमचा धोका निर्माण होऊन कृष्णाकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान होणार आहे. या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे. कर्नाटक सरकारने तातडीने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी आपण येथील शेतकरी आणि कष्टकरी जनता ग्रामस्थ यांच्या व्यथा राज्य सरकारकडे मांडाव्यात. तसेच केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून अलमट्टी धरणाच्या वाढणाऱ्या उंचीला तातडीने विरोध करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे विश्वास बालीघाटे प्रकाश बालीघाटे, प्रकाश गावडे, बंडू उमडाळे, दीपक पाटील, रावसाहेब लठ्ठे, प्रदीप चव्हाण, बाहूबली पाटील, प्रशांत कुगे, सचिन उदगट्टी, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.