अध्याय एकविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, मी सांगितलेला वेद हा जगाचा गुरू आहे. त्याने प्रथमदर्शनी व्यवहार दाखवून लोकांचा उद्धार होण्यासाठी स्वधर्म सांगितला आहे. स्वधर्म म्हणजे वाटय़ाला आलेले काम निरपेक्षतेनं करणे. स्वधर्मानुसार वागल्यास लोकांचे हितच होते. तो नाना प्रकारचे गुणदोष दाखवून लोकांना विषयाच्या बाहेर काढतो. अशा रीतीने वेद हा जगावर उपकार करतो. वेदाने केव्हा, कुठे, कोणत्या परिस्थितीत कर्म केले असता ते शुभफळ देते, ते सविस्तर सांगितले आहे. जेणेकरून लोकांनी त्यानुसार वागून चारही पुरुषार्थ साधावेत आणि मुक्ती मिळवावी. वेदांत सकाम आणि निष्काम या दोन्ही भावनांनी कर्म करता येते असे सांगितले आहे. सकाम भावनेने केलेले सत्कर्म स्वर्ग मिळवून देते आणि निष्काम भावना आत्मज्ञान करून देते. आत्मज्ञान मिळवणे, मोक्षप्राप्ती करून घेणे आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटणे हेच माणसाचे ध्येय असायला हवे हे नक्की.
देश, काल, द्रव्यसंग्रह, मंत्र, कर्म आणि निरोगी कर्ता ह्या सहांच्या अवस्था शुद्ध असल्या म्हणजे स्वधर्म हा फलद्रूप होतो.
अनाथ, दीन लोकांच्या संकटसमयी जे द्रव्य पोचते किंवा माझ्या भक्ताकडे जाते, तीच खरोखर ‘द्रव्याची पवित्रता’ होय. स्वकष्टाने मिळविलेले द्रव्य धर्मशास्त्रानुसार शुद्ध होय. पण धनलोभात जीव गुंतलेला असला तर ते सारे द्रव्य अशुद्ध होय. ज्या मंत्राने मंत्राचा अर्थ साध्य होतो, तोच मंत्र सर्वथा शुद्ध होय. ज्या मंत्रामुळे अंगामध्ये अभिमान वाढतो किंवा ज्यात जारण-मारण, उच्चाटन इत्यादी असते, ते मंत्र अपवित्र होत. ज्या कर्माच्या योगाने कर्मबंधन तुटते, ते कर्माचरण अत्यंत शुद्ध होय.
स्वतः कर्माचरण करीत असता ज्यात देहाभिमान खवळतो आणि कर्त्याचे बंधन अधिक दृढ होते, ते कर्म अपवित्र होय. ज्या कर्माने कर्माचा निरस होतो, तेच कर्म खरोखर शुद्ध होय, आणखी उद्धवा! जेथे सदासर्वदा अविनाश समबुद्धि असते, तो देश पुण्यवंत होय.
सुक्षेत्रात वास केला आणि तेथेही दुसऱयाचे गुणदोष दिसू लागले तर तो देशही तामस म्हणून समजावा. त्याच्या योगाने कर्त्यांचा अचूक नाश होतो.
अन्य क्षेत्रात दोष पाहिले तर त्यांचा उत्तम क्षेत्रात नाश होतो. परंतु उत्तम क्षेत्रातच दोष पाहिले तर ते मात्र कल्पांतीही जीवाला सोडीत नाहीत. जेथे ऐक्मयभाव उत्पन्न होतो, तो देश निर्मळ म्हणून समजावा आणि चित्त सुप्रसन्न असलेली जी वेळ, तोच साधकाचा पुण्यकाळ जाणावा. ‘ब्राह्ममुहूर्त’ म्हणजे पहाटेची वेळ ही स्वभावतःच शुद्ध होय. त्यातही चित्तक्षोभ होईल तर तोही काळ खरोखर अपवित्र होय, असे वेदार्थांचे म्हणणे आहे. आता जो कर्मकर्ता असतो त्याची कर्मांची अहंता नष्ट झाली, तरच ते कर्म स्वाभाविकपणे चालते. हीच कर्त्याची पवित्रता होय. त्यात जो कोणी ‘मीच कर्ता’ असे म्हणेल, तो अत्यंत बद्ध होतो. ह्याप्रमाणे धर्माधर्माचे सहा प्रकार आहेत. हेच वेदार्थांच्या तत्त्वातील सार आहे. याच धर्माने पुरुष मुक्त होतो व अधर्माने अपवित्र होऊन मोठे बंधन पावतो. ह्याप्रमाणे गुणदोषांचे लक्षण सांगू लागले तर फार खोल आहे. त्यात मोठमोठे ज्ञानी, अत्यंत चतुर पंडितसुद्धा घोटाळय़ात पडतात. एखाद्याचा एक गुण उत्तम म्हणावा तर तोच फिरून दोष ठरतो! याप्रमाणे कर्मच कर्मामध्ये भयंकर दोष उत्पन्न करते. कर्मामध्ये आचमन करणे हे मुख्य आहे. कारण हेच कर्म शुद्धीचे मूळ होय. पण तेच दक्षिणेस तोंड करून केल्यास मोठा दोष उत्पन्न होतो.
कानाची पीडा ज्याने कमी होते, तेच औषध तोंडात घातल्यास अतिशय पीडा होऊन प्राणांतिक समय प्राप्त होतो. आचमन करताना उडीद बुडेल इतकेच पाणी घेतल्यास तो पुरुष पवित्र होतो. पण तेच अधिक घेतल्यास मद्यपानाचा दोष लागतो. फणस खाताना गोड लागतो, पण तोच जर अधिक खाल्ला, तर पोटात कळ उठून ब्रह्मांड फुटून जाईल इतका भयंकर त्रास होतो. असा कर्मातच कर्माचा विधिनिषेध प्रकार असतो. केव्हा केव्हा गुण असतो, तोच दोष होतो. तसेच कोठे कोठे दोषानेही पुष्कळ पुण्य लाभते.
क्रमशः