अध्याय अठरावा
निष्काम आराधनेच महत्व भगवंत सांगत आहेत. ते उद्धवाला म्हणाले, स्वधर्म आचरूनच माझी प्राप्ती होते हे लक्षात ठेव. मी तुला हा वर्णाश्रमांचे पालन करणाऱयांच्या आचारधर्म सांगितला. हे करताना जर तो माझ्या भक्तीने संपन्न असेल, तर त्याला खात्रीने मोक्षाची प्राप्ती होते.
अत्यंत प्राचीनकाळापासून चालत आलेला जो स्वधर्माचार, खरोखर मोक्ष देणारा आहे. पण हे लक्षात न घेता त्याच स्वधर्माचरणाने सकाम लोक स्वर्गादि लोकांची इच्छा करतात ! पण तो स्वर्ग मिळाला तरी तेथून मृत्युलोकावर जन्म घ्यावा लागतोच. ह्याप्रमाणे माझी भक्ती न करता लोक सकामपणाने स्वधर्म नासून टाकतात. ब्राह्मणलोक स्वधर्माची उपेक्षा करतात मी ब्राह्मणांना गायत्री हा स्वतंत्र मंत्र दिला असता त्याची उपेक्षा करून भलतेच मंत्रतंत्र जपतात व अशुद्ध आचाराने वागतात! ब्राह्मणलोक सौर, शाक्त, गाणपत्य, इत्यादि अनेक प्रकारच्या दीक्षा घेतात पण एकही जण गायत्रीचे अनु÷ान करत नाही! वेदरूपाने ब्राह्मणांच्या हृदयातच राहणाऱया माझ्या महिमा न जाणता वेदाचे केलेले पारायण विकून टाकतात ! स्वर्गफळाची इच्छा धरून अनेक प्रचंड यज्ञ करतात. तात्पर्य सकाम कल्पना ह्या स्वधर्माला बुडवतात. ज्या वेदामध्ये कर्माचे फळ सांगितले आहे, त्या वेदात खरे काय प्रतिपादन केले आहे पण ते मुळीच न जाणता वाटेल ती बडबडच खरी समजतात.
औषध घ्यावे म्हणून आई मुलाला चिमूटभर साखर देत असते परंतु साखर देणे हा काही मुख्य उद्देश नसतो. तर पोटातला प्रबळ रोग हटावा हाच मुख्य उद्देश असतो. तद्वत वेदाने जे फळ सांगितले आहे, ते केवळ स्वधर्माची रुची उत्पन्न व्हावी एवढय़ाकरताच कारण स्वधर्म हा चित्तातील सर्व मळ नाहीसा करणारा आहे पण स्वधर्म सोडून देऊन सकाम कर्मेच करू गेल्यास त्यातून कष्ट केल्याशिवाय क्षुद्र मनोरथही पूर्ण होत
नाहीत.
ज्या द्रव्याने अमृत हाती येते, ते खर्च करून मद्यच विकत घेतल्यास अधर्म होतो, माद चढतो, वेडे चाळे करतो आणि त्यामुळे सारे जग तोंडावर थुंकते. जिव्हा जर दुरुक्ति बोलेल तर यमाचे तडाखे मस्तकावर बसतात पण तीच जिव्हा ‘राम राम’ म्हणेल तर त्या हरिभक्तांना यमसुद्धा कापतो. त्याप्रमाणे उत्तम जन्माला येऊन सकाम कर्म केले असता अत्यंत दुःख भोगावे लागते आणि असंख्य जन्ममृत्यु सोसावे लागतात पण त्याच देहाने स्वधर्माचरण केले, तर सारेच कर्म लयास जाऊन जन्ममरणाचे फेरे चुकतात. पण हे मर्म पुष्कळ लोकांना कळत नाही. स्वधर्माने भगवंताची भक्ति घडते हेच ह्यातले गूढ रहस्य आहे.
सद्गुरूचे तीर्थ घेतले असता अत्यंत पवित्रता प्राप्त होते तर मग हिकडच्या तिकडच्या शेकडो तीर्थाकडे धावत सुटण्यांत काय अर्थ आहे ? किंवा ईश्वरभावनेने पित्याची पूजा केली, तर सहज मोक्ष प्राप्त होतो, तर मग ज्ञात्या लोकांनी देव-देवतांना कशाकरिता भजावे ? तद्वत् स्वकर्म करतानाच निष्कर्मता प्राप्त होते पण त्याच स्वधर्मामध्ये फलाची इच्छा धरली की, प्राणी खऱया स्वार्थाला अंतरतात.
निर्विकल्प चित्ताने स्वधर्माचरण करणे याचेच नांव ‘शुद्ध भजन’ होय. त्या भजनानेच मी प्रसन्न होऊन माझ्या भक्तांना विवेकयुक्त वैराग्य व ज्ञान देतो. त्याच ज्ञानाने बुद्धी पवित्र होते. चित्त शुद्ध झाले म्हणजे त्यातच माझी ‘परम भक्ती ’ उत्पन्न होते. त्या भक्तीनेच भक्तांना माझ्या श्रे÷ स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून निष्काम स्वधर्माचरण तेच माझे उत्तम भजन होय. त्या भजनानेच भक्तोत्तम स्वतःच पुरुषोत्तम होऊन राहतात. स्वधर्म हाती लागला की, स्वकर्म तत्काल निरास पावते आणि संसाराचा सारा भ्रम दूर
होतो.
याप्रमाणे स्वधर्माने परमपदाची प्राप्ती होते. स्वधर्मासारखा परिस निर्विकल्पपणे सापडताच तो दृश्य पदार्थास लावला असता, ते सर्व पदार्थ चिन्मात्र सुवर्ण म्हणजे ब्रह्ममयच होऊन जातात. स्वधर्मासारखा सूर्य निष्कामतेने अंतःकरणात उदय पावला की, तो अज्ञानरूप रात्र नाहीशी करून सदासर्वदा स्वप्रकाशपणानेच नांदतो.
अध्याय अठरावा समाप्त