अध्याय सत्रावा
भगवंत म्हणाले, क्षत्रियांच्या शरीरसामर्थ्याचा इतका चमत्कार असतो की, तो एकटाही लाखो मनुष्यांवर तुटून पडतो आणि मस्तक तुटले तरी धडाने शत्रुचे तोंड फोडतो. तो समरांगणांत शिरला म्हणजे दुसऱयाचे आपल्याला साहाय्य आहे किंवा नाही याचा विचार करीत नाही. सैन्यात मुसंडी देऊन तो मोठमोठय़ा वीरांचा सफाया करतो.
कल्पांतसमय जरी प्राप्त झाला, तरी त्याच्या चित्ताला धाक म्हणून वाटतच नाही. अशा प्रकारचे जे स्वभावसिद्ध अढळ धैर्य, त्यालाच धृती असे म्हणतात.
चौऱयांशी प्रकारचे दांडपट्टे परजण्यामध्ये क्षत्रिय वाकबगार असून, शस्त्रास्त्रधारणाशक्तीही त्याची उत्तम असते व तो धर्मास अनुसरून युद्ध करण्यात प्रवीण असतो. याचेच नाव क्षत्रियांची ‘धृती’ होय. आता शूरांचे शौर्य कसे असते म्हणशील तर, तो शत्रूचे नावसुद्धा उरू देत नाही, त्याला कोणी कुठे शत्रूच असत नाही. असा पराक्रम करणे याचे नाव ‘शौर्य’ होय. त्याची वृत्ती धर्मयुद्धाची असते. म्हणूनच त्याला विजयश्री प्राप्त होते. बेसावध किंवा निःशस्त्र असेल त्याला तो मारत नाही. महाशूर असतात ते पळत्यालाही मारीत नाहीत. रणांगणात एकदा समोरासमोर आले की, पाऊल मागे घेत नाहीत.
एकटाच हजारो वीरांचा फडशा उडवितो. हेच स्वधर्माप्रमाणे खरे शौर्य होय. सर्वात मोठा शत्रु म्हणजे मृत्यु होय. त्याच्या एवढा शत्रु दुसरा कोणीच नाही. त्यालाच स्वपराक्रमाने तो मुळी नाहीसा करून टाकतो. त्याच्या शौर्याचे वर्णन देवदानवसुद्धा करीत असतात.
याप्रमाणे आपल्या शौर्यानं सारी पृथ्वी निर्वैर करून टाकणे हेच खरे ‘शौर्य’ होय व हाच क्षत्रिधर्माप्रमाणे क्षत्रियांचा चौथा गुण होय. शस्त्रांचे धाव येऊन मस्तकावर आदळले, किंवा पिसाऱयासहवर्तमान बाण अंगांत घुसले, तरी रणांगणामध्ये जो मागे सरत नाही, हीच क्षत्रियांची ‘सहिष्णुता’ म्हणजे सहन करायची ताकद होय. हत्तींच्या झुंडीच्या झुंडी जरी येऊन भिडल्या, मोठमोठाले वीर जरी चवताळून आले, तरी तो आवेग वीरशिरोमणी सहन करतो. ह्याचंच नाव खरीखुरी सहिष्णुता. समुद्राच्या लाटांच्या तडाक्मयाने महापर्वत जसा मागे हटत नाही, त्याप्रमाणे जो शत्रुच्या सैन्याच्या आघाताने रणांगणातून माघार घेत नाही किंवा यशापयशाचे सुखदुःख किंवा हर्ष-विषाद ही क्षत्रियाच्या चित्ताला बाधत नाहीत, ह्यालाच संपूर्ण सहिष्णुता म्हणतात. हिलाच ‘तितिक्षा’ असेही म्हणतात. हे क्षत्रियांचे पाचवे लक्षण होय.
आता क्षत्रियांचा औदार्याचा गुण म्हणजे दातृत्वशक्ति तीही ऐक. क्षत्रियांच्या स्वभावाला द्रव्य हे केवळ तृणासमान वाटते, म्हणून ते याचकांचे मन तृप्त होईपर्यंत सर्वस्व दान देत असतात. देश, काल, सत्पात्र पहावयाचे व तेथेही सन्मानपूर्वक आणि मनात कोणताही किंतु न आणता विधियुक्त मोठे दान करावयाचे हेच क्षत्रियाचे ब्रीद असते. चंद्राने चकोराला पाहिले की, तो त्याला अमृत देताना कधी कंटाळत नाही त्याप्रमाणेच ह्याची वृत्ती याचकाच्या ठिकाणी असते. क्षत्रिय कधी त्याला पराङ्मुख होत नाही. असे स्वाभाविकपणे दान देणे हाच क्षत्रियांचा स्वाभाविक गुण आहे. ह्याचंच नाव ‘उदारपण.’ हे क्षत्रियांचे सहावे लक्षण होय. क्षत्रियांचा परमार्थप्राप्तीचा उपाय म्हणजे स्वधर्मनिष्ठा. तिला अनुसरून जो जो काही उद्योग करावयाचा त्याला ‘उद्यम’ असे
म्हणतात.
आपले प्राणसुद्धा खर्ची घालून गोब्राह्मणांचे संरक्षण करणे, स्वधर्माने प्रजेचे पालन करणे आणि कोणासही उपद्रव न देता पृथ्वीचे रक्षण करणे. ह्याचे नाव ‘उद्यम’ हें लक्ष्यात ठेव. हेच क्षत्रियांचे सातवे लक्षण होय. आतां त्यांच्या धर्मातील ‘स्थैर्य’ ह्या गुणाचेही लक्षण ऐक. गोब्राह्मणांचे संरक्षण करताना व स्वधर्माने प्रजेचे पालन करताना त्यांच्या मनाला कंटाळा येत नाही, हीच क्षत्रियांची स्थिरता होय. स्वधर्मातील जी ‘स्थिरता’ तेच खरोखर क्षत्रियांचे आठवे लक्षण होय. आता त्यांचे ब्राह्मणभक्तीचे लक्षण सांगतो ऐक. क्षत्रियांना परमार्थप्राप्तीसाठी ब्राह्मण हा गुरु होय.
क्रमशः