संतप्त भाजप खासदारांची मागणी ः विषारी दारु प्रकरणी संसदेत गदारोळ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिहारमध्ये गेले तीन दिवस गाजत असलेल्या विषारी दारुबळी प्रकरणाची संतप्त प्रतिक्रिया संसदेतही उमटली आहे. विषारी दारुच्या बळींची संख्या आता 50 हून अधिक झाली आहे. या प्रकरणी बिहार सरकारविरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकसभा आणि राज्यसभेत भाजप खासदारांनी केली. गदारोळामुळे संसदेचे कामकाज काहीकाळ स्थगित करण्यात आले होते.
बिहारधील पश्चिम चंपारण मतदारसंघाचे खासदार संजय जयस्वाल यांनी हा मुद्दा गुरुवारी लोकसभेत शून्यकाळात उपस्थित केला. बिहारमध्ये संपूर्ण दारुबंदी असूनही तेथील पोलीस आणि अधिकाऱयांच्या संगनमताने अवैध दारुचा व्यापार प्रचंड प्रमाणात होत आहे. दारुबंदी केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात भरपूर दारु उपलब्ध होत आहे. दारुबंदी कायद्याची अंमलबजावणी भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतली आहे. त्यामुळे दारुबंदीचा उद्देशच नाहीसा झाला असून हा कायदा केवळ कागदावरच राहिला आहे, अशी कठोर टीका जयस्वाल यांनी केली.
दारु गाळण्याचा धंदा जोरात
दारुबंदी असूनही दारु गाळण्याचा धंदा जोरात आहे. घरोघरी ज्याला हवी आहे तितकी दारु पुरविली जात आहे. त्यातूनच हे विषारी दारुचे प्रकरण समोर आले आहे. कमी प्रतीची स्वस्त दारु हवी तितकी उपलब्ध असल्याने लोकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ चालला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकार सर्व काही माहीत असूनही याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे बिहार सरकारला जाब विचारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
केंद्रीय दल पाठवा
केंद्र सरकारने त्वरित बिहारमध्ये एका प्रतिनिधी मंडळाला पाठवून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. दारुबंदी कायदा आणि त्याचा उघडपणे होत असलेला भंग यासंबंधी अहवाल केंद्र सरकारने मागवावा. त्याशिवाय बिहार सरकारला जाग येणार नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रशासनावरचे नियंत्रण सुटले असून राज्य गुन्हेगारांच्या ताब्यात जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत, असा आरोप भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांनी केला आहे.
प्रशांत किशोर यांचेही शरसंधान
बिहारमध्ये जनसुराज पदयात्रा उपक्रम करीत असलेले राजकीय तज्ञ प्रशांत किशोर यांनीही नितीश कुमार सरकारला धारेवर धरले आहे. नुकतीच घडलेली विषारी दारुबळीची घटना या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घडली आहे. त्यामुळे या भीषण घटनेची जबाबदारी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवरच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. मात्र, त्यांनी या घटनेसाठी राष्ट्रीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही जबाबदार धरले. भाजपनेही प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने त्याचे उत्तरदायित्व पार पाडले नाही. त्यामुळे बिहारमधील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे हे सामुदायिक उत्तरदायित्व आहे, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला. पदयात्रेत ते यावर आवाज उठविणार आहेत.
बिहारमध्येही संतप्त प्रतिक्रिया
नुकत्याच घडलेल्या विषारी दारुबळी प्रकरणावरुन बिहारमध्येही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नितीश कुमार यांच्याच पक्षात दारुबंदी धोरणाविरोधात आवाज उठू लागला असून त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.